नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहराचा पॉझिटीव्हीटी रेट कमी येवूनही शहरातील व्यापार सुरळीत सुरु होत नाहीत. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतंत्र युनिट करून शहरातील सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा सध्या अनलॉक स्थितीत आहे. गेले अनेक महिने व्यापार बंद असल्याने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. सर्व दुकाने सुरु करण्याची मागणी व्यापारी बांधवांकडून होत आहे. वास्तविक पाहता, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण आदी परिसराचा केंद्रबिंदू कोल्हापूर आहे. सीपीआरसह इतर सरकारी व खासगी वैद्यकीय सेवा चांगल्या व माफक दरात उपलब्ध असल्याने आसपासच्या भागातून शहरात दाखल होणाऱया रुग्णांची संख्या अधिक आहे. परराज्यातील रुग्णही कोल्हापुरात उपचारासाठी येत आहेत.
त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी आणि इतर जिल्हे आणि परराज्यातील मोठÎा प्रमाणात रुग्ण दाखल झाल्यानेही कोल्हापूरचा पॉझिटीव्हीटी रेट वाढल्याचे दिसत आहे. याचा फटका शहराला बसत असून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. यासह विकासही रखडला आहे. कोल्हापूर शहरात सध्या पॉझिटीव्हीटी रेट कमी येत असून, जनजीवन सुरळीत करण्याकरिता शहराचे स्वतंत्र युनिट करून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी आणि व्यापारी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक अहवाल तातडीने मागविण्यात आला असून, याबाबत शासन सकारात्मक निर्णय देवून व्यापारी वर्गास दिलासा देईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
दुकाने सुरु करण्याचे प्रयत्न
शिवसेना नेहमीच व्यापारी बांधवांच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. या परिस्थितीतही व्यापारी बांधवांच्या सोबत असून, राज्य शासनाशी समन्वय साधून या प्रश्नातून तात्काळ मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.माजी आमदार राजेश क्षीरसागर