प्रतिनिधी / कोल्हापूर
अमर रहे अमर रहे शहीद संग्राम पाटील अमर रहे. या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला अन् निगवे खालसाचा भूमिपुत्र शहीद वीर जवान संग्राम पाटील जनसागराच्या साक्षीने अनंतात विलीन झाला काश्मीरमधील राजुरी जिल्ह्यात भारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असताना भारत मातेच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेल्या शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांना चनिशेटी विद्यालयाच्या समोरील क्रीडांगणावर साश्रू नयनांनी लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
शनिवारी पहाटे जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान सैन्याकडून केलेल्या गोळीबारात निगवे खालचा भूमिपुत्र आणि 16 मराठा बटालियनचा शूरवीर शिलेदार संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले होते. ही बातमी निगवे खालसा गावाबरोबरच परिसराला सुन्न करणारी ठरलेली होती. गेले दोन दिवस शहीद संग्रामच्या जाण्याने संपूर्ण निगवे खालसा गाव शोकसागरात बुडाले होते. त्यामुळे गावचा अभिमान असलेला संग्राम आम्हाला पाहायचा आहे ही भावना प्रत्येक गावकऱ्यांच्या मनात, मुखात कंठ दाटून बाहेर पडत होती. गेले दोन दिवस ग्रामस्थांना संग्रामच्या पार्थिवाची प्रतिक्षा होती.
सोमवारी सकाळी सात वाजता शूरवीर शहीद जवान संग्राम पाटील याच्या पार्थिवाचे आगमन गावात झाले. गेले दोन दिवस त्याच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी एकवटलेल्या ग्रामस्थांची प्रतिक्षा संपली आणि सर्वांचे अश्रूंचा बांध फुटला.
जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव प्रथमता त्यांच्या घरी आणण्यात आले. यावेळी पार्थिवाचे दर्शन होताच त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आपला भूमीपुत्र देशाच्या रक्षणासाठी शहीद झाला हा अभिमान एका बाजूला तर दुसर्या बाजूला सर्वांशी मन मिळून वागणारा आपुलकी जपणारा आणि युवकांना सुट्टीवर आल्यानंतर प्रोत्साहन करणारा आपला संग्राम पुन्हा दिसणार नाही या आठवणीने अनेक ग्रामस्थांना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागली.