उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शाहूपुरी कुंभार गल्लीत पाहणीवेळी ग्वाही, शिवाजी पुलाला भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर
शाहूपुरीतील कुंभार गल्लीत जयंती नाल्याचे पाणी प्रतिवर्षी शिरते, त्यामुळे कुंभारांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कुंभार व्यावसायिकांना एसएफआय वाढवून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. येथील ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या निधीची पुर्तता केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी शिवाजी पुलाचीही पाहणी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारचा कोल्हापूर दौरा रद्द झाला, मंगळवारी त्यांनी कोल्हापुरात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शाहूपुरी कुंभार गल्लीला भेट दिली. तेथील नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवाजी पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेविका पुजा नाईकनवरे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, प्रांताधिकारी वैभव नावडकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त विनायक औंधकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर स्थानिक नागरिक, महिलांनी महापुराने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यामध्ये प्रतिवर्षी पुराचे पाणी शाहूपुरीतील चार गल्ल्यांत शिरत आहे. यामध्ये ड्रेनेजचा प्रश्नही आहे. पुर्वी जयंती नाल्याचे पाणी या परिसरात येत नव्हते, आता प्रतिवर्षी हा भाग पुराच्या पाण्याखाली जात आहे. त्यामुळे पर्यायी जागा द्यावी, सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली. तसेच आम्ही पार्किंग रिकामे सोडतो, बांधकामास परवानगी द्या, असेही साकडे घातले. माजी नगरसेविका पुजा नाईकनवरे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांनीही येथील पुरस्थितीची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शाहूपुरीतील कुंभार व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यापेक्षा त्यांना एसएफआय वाढवून दिला जाईल, त्यासाठी महापालिका प्रशासनाला त्यांनी सुचना केली. प्रशासक डॉ. बलकवडे यांनी येथील ड्रेनेज प्रश्न सोडवण्यासाठी 10 कोटींची मागणी केली. यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी पुल ते केर्लीपर्यत भराव नसलेला उड्डाणपूल आवश्यक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पुलापासून केर्लीपर्यंत भराव न टाकता उड्डाणपूल आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना सांगितले. नदीपात्रातील वाढलेली बांधकामे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निदर्शनास आणली, यावर सविस्तर आढावा घेण्याची सुचना त्यांनी केली.
पवार यांनी `पाणी कुठंपर्यंत आलं होतं, याची माहिती घेतली. नेहमी पूरस्थितीमध्ये पाण्यात जाणारा भाग पाहून पालकमंत्र्यांनी या परिसरात भराव न टाकता केर्ली ते शिवाजी पूल असा उड्डाणपूल करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. यावर आपण केंदीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
चौकट
पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांखाली आणा, निर्बंध शिथील करू
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटÎे यांनी कोरोना निर्बंधामुळे उद्योजक, व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे निर्बंध शिथील करावेत, वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूरचा पॉझिटिव्हीटी रेट विचारला, तसेच कोणत्या टप्प्यात जिल्हा आहे, अशी विचारणा केली. यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी जिल्हÎाचा पॉझिटिव्हीटी रेट सध्या 6.2 टक्के आहे. जिल्हा तिसऱया टप्प्यात असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आधी पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांखाली आणा, त्यांनंतरच निर्बंध शिथील करू, अगदी सध्या 4 वाजेपर्यत दुकाने उघडी आहेत, ही वेळ एक ते दीड तास वाढवून देऊ, असे स्पष्ट केले. यावर पुढील आठवडÎात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांखाली येईल, असे मनपा प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले.