पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती, सत्ताधारी नेत्यांकडून मनधरणीचा केवीलवाणा प्रयत्न, काहींची दुपारी बाराची झोप उडाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
सत्ताधाऱ्यांविरोधात राजर्षी शाहू शेतकरी आघाडी भक्कम झाली आहे. त्यामुळे या आघाडीविरोधात चुकीच्या वावड्या उठवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सत्तारुढ गटाकडून केला जात आहे. शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी सत्ताधारी आघाडीसोबत जाणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असून ते शाहू आघाडीसोबतच राहतील. तरीही त्यांनी पुन्हा आपल्या आघाडीमध्ये यावे यासाठी सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी सरुड येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन मनधरणी केली. यासाठी काहींजण दुपारी बाराची झोप मोड करून भेटीगाठी घेत असल्याचा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.
शेतकरी संघटनांनी २६ मार्चला पुकारलेल्या `भारत बंद’ला पाठींबा देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर सकाळी ११ ते ४ या वेळेत उपोषण केले. यावेळी `गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत पालकमंत्री पाटील बोलत होते.
शाहू आघाडीमध्ये सर्वसमावेशक उमेदवार
राजर्षी शाहू शेतकरी आघाडीमध्ये कोणते उमेदवार घ्यायचे याबाबत ग्रामविकासमंत्री व मी चर्चा करून निर्णय घेणार आहे. आघाडीमध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्या-त्या तालुक्यातील ठरावधारकांची संख्या पाहून उमेदवारी दिली जाणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
पॅनेल निश्चित झाल्यानंतरच प्रचार सुरु
गोकुळसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 2 एप्रिलला छाननी होणार आहे. त्यानंतरच शाहू शेतकरी आघाडीचे पॅनेल निश्चित केले जाणार असून प्रचार सुरु करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
आमदार राजेश पाटील शाहू आघाडीसोबतच
राष्ट्रवादीचे चंदगडचे आमदार राजेश पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याच्या मुद्यावरून काही किरकोळ मतभेद आहे. पण ते लवकरच दुर होतील. त्यामुळे आमदार पाटील हे राजर्षी शाहू आघाडी सोबतच राहतील असा विश्वास, पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
काहींची दुपारी बाराची झोप उडाली
सत्तारुढ गटाविरोधात आम्ही पॅनेल केले म्हणून त्यांचे नेते आता ठराव धारक मतदारांची भेट घेत आहेत. यापुर्वी ते कधीही त्यांच्या भेटीला जात नव्हते. आता काही नेत्यांची दुपारी बाराची झोप उडाली असून ते भेटीगाठी घेत असल्याचा टोला माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता पालकमंत्री पाटील यांनी लगावला. सत्ताधारी नेत्यांकडून सभासद हिताचा कारभार केल्याचा दावा केला जात असेल तर मग ते निवडणुकीला सामोरे का जात नाहीत ? सर्वोच्च न्यायालयात जाऊन निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न का करत आहेत ? त्यांच्या या भितीमध्येच `गोकुळ’च्या कारभाराचे सत्य आणि त्यांचा पराभव लपला आहे.