बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.कोरोनाचे मृत्यू सर्वाधिक कोल्हापूर शहरात होत असल्याने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही कोल्हापूरात पंचगंगा स्मशानभूमीत करण्यात येत आहेत.यामुळे पंचगंगा स्मशानभूमीवर ताण वाढला असून स्मशानभूमीतील कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत.
कोरोनाचा जिल्हय़ात सामूहिक संसर्ग वाढला आहे.यामुळे रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.रोज अडीचशे ते तीनशेच्या घरात रुग्ण सापडत आहेत.या तुलनेत कोरोना रुग्णावर उपचार करणारी यंत्रणा मात्र तोकडी पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सीपीआरसह शासकीय रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.यामुळे येणाऱया नवीन रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत.खासगी रुग्णालयातही काही बेड आरक्षित ठेवून उपचार करण्यात येत आहेत.तसेच हॉल ताब्यात घेऊन बेड उपलब्ध करण्याचे नियेजन करण्यात येत आहे.
जिल्हय़ात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्यापैकी बहुतांश रुग्णांना कोल्हापूरात सीपीआरमध्ये दाखल करण्यात येत आहे.याबरोबर शहरातूनही शेकडो रुग्ण याठिकाणी येत आहेत. यामुळे सीपीआर प्रशासनावरील ताण वाढला आहे. गेल्या आठवडय़ापासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.कोल्हापूरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बहुतांश मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमीत वेगळे बेड तयार ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी दहा बेड आहेत.पण हे बेडसुध्दा अपुरे पडू लागले आहेत.यामुळे मृतदेह आल्यानंतर अंत्यविधी आणि रक्षाविसर्जन सहा तासातच उरकले जात आहेत.
दुसऱया मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी काही तासात बेड रिकामा-
कोरोनामुळे सद्या पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी गर्दी करता येत नाही.तसेच कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नातेवाईक मृतदेहाबरोबर येण्याचे प्रमाणही कमी आहे.काही मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी तर नातेवाईक येतही नाहीत.अशावेळी नातेवाईकांना अंत्यदर्शन मिळावे यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून सहा तासात येऊन जाण्याचे आवाहन केले जाते.यानंतर मात्र सहा तासातच अंत्यसंस्कार अन रक्षाविसर्जन करुन दुसऱया अंत्यसंस्कारासाठी बेड रिकामा करण्यात येत आहे.
बापट कॅम्प स्मशानभूमीत सहा बेडचे नियोजन- अरविंद कांबळे,आरोग्य निरीक्षक
पंचगंगा स्मशानभूमीत कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातूनही कोरोनाचे मृतदेह येत आहेत.यामुळे येथील गर्दी वाढून बेड अपुरे पडत आहेत.यामुळे महापालिकेने बापट कॅम्प स्मशानभूमीत कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सहा बेडचे नियोजन केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱयांकडून पीपीई कीट घालून आणि काळजी घेत रात्रंदिवस हे काम सुरु आहे.