राजेंद्र होळकर / इचलकरंजी
हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याच्या बॉयलरला मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. बॉयलरच्या ठिकाणी असलेल्या सुमारे १० लिटर्सचा ऑईलचा टँक आणि सुमारे ४० टन दगडी कोळशाला आगीने घेरले.
आगीची माहिती समजताच कारखाना प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यावरून इचलकरंजी नगरपालिकेचे २, संजय घोडावत उद्योगसमूह १, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना १ असे एकूण ८ पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. या ७-८ अग्निशामक पाण्याच्या बंबानी अनेक फेर्या करत दुपारी १.३० पर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. बॉयलर विभागाचे पत्रे जळून खाक झाले आहेत. आगीच्या धुराचे लोट सुमारे ३ किलोमीटरपर्यंत पसरले होते. या आगीमध्ये सुमारे १० कोटींचे नुकसान झाल्याचे प्रथमिक अंदाज आहे.