प्रतिनिधी/ सातारा
राज्यास मार्गदर्शी ठरणारा व राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सातारा जिह्यातील कोळकी (ता. फलटण) येथे राबवण्यात येणार आहे. मैला गाळ प्रकल्प कोळकी येथे होण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे कायम आग्रही व प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. राज्य शासनाने या प्रकल्पास मान्यता दिली असून ही सातारा जिह्यास अभिमानाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी यावेळी काढले. दरम्यान, राज्यातील पहिला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प मसूर येथे साकारला जाणार असून त्यास मान्यता मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण स्वच्छता अभियानात यशस्वीपणे लोकांच्या सहभागातून राबवून सातारा जिह्याला संपूर्ण देशात नावलौकिक मिळवला आहे. जिह्याने पहिल्या टप्यात जिह्यातील पहिल्या टप्यात जिह्यातील सर्व गावे निर्मलग्राम केली आहेत. यामध्ये लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून शौचालय बांधकाम व त्याचा नियमित वापर करण्याचे काम केले. स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 सुरु झाल्यापासून संपूर्ण गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी घर तिथे शौचालय उपक्रम यशस्वीपणे राबविला. सर्व गावांमध्ये हागणदारीमुक्त अधिकचे नव्याने उपक्रम राबविण्यात येत असून गावस्तरावरील सर्व कुटुंब संस्था, शाळा, अंगणवाडीमध्ये शौचालय व शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यात आले असून कुटुंबस्तरापासून सार्वजनिक स्तरापर्यंत घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम जोमाने सुरु आहे. देशात हागणदारीमुक्त अधिक गावे करण्याच्या अभियान देशपातळीवरुन राबवण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेने प्रायमू पुणे या संस्थेच्या सहकार्याने राज्यात पाणी व स्वच्छता विभगास कोळकी (ता. फलटण) गावचा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प आराखडा सादर केला होता. त्यास राज्यशासनाने नुकतीच मंजूरी दिली असून या प्रकल्पासाठी 75 लाख इतका निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामध्ये कोळकी व आसपासच्या गावातील शौचालयांच्या शोषखड्डय़ातील मैला व सेप्टीक टँकमधील बाहेर पडणाऱया मैल्यावर प्रक्रिया करुन त्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पामधून उत्कृष्ट खत निर्मिती प्रक्रिया करुन त्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पामधून उत्कृष्ट खत निर्मिती करुन ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणार असून गावातील दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार निंत्रणात येऊन लोकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प लोकसहभाग व शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने यशस्वीपणे राबवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
स्वच्छता अभियानात जिल्हा कायम अग्रक्रमावर राहावा त्याचबरोबर जनतेमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती व्हावी यासाठी जिल्हा परिषद कायम विविध योजनेतून निधी उपलब्ध करुन देत आहे. कोळकी येथील मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प उभारणे व यशस्वीपणे कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून जिह्यातील गावांमध्ये स्वच्छता व सातत्य रहावे व दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात असे दिशादर्शक प्रकल्प जिह्यात राबवले जातील. कोळकीचा मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सर्वांना मार्गदर्शक ठरेल, असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
पहिल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता
कराड तालुक्यातील मसूर येथे राज्यातील पहिला प्लास्टिक निर्मूलन प्रकल्पास मान्यता मिळाली असून तो लवकरच उभारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 16 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प लोकसहभागातून व सर्व ग्रामपंचायतीच्या समन्वयाने यशस्वीपणे राबवण्यात येणार आहे. जिह्यातील मोठमोठय़ा लोकसंख्येच्या व यात्रा, बाजाराच्या ठिकाणांच्या गावांमध्ये कचरा ही समस्या निर्माण झाली असून त्यामुळे जलजन्य आजार निर्माण होवू लागले ओहत. प्लास्टिक विघटन होत नसल्याने शेतीचे नुकसान होत असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. प्लास्टिक जाळल्याने त्यामधून विषारी वायू निर्माण होवून श्वसनाचे आजार होत आहेत. यासाठी मसूर येथे या प्रकल्पास मंजूरी मिळाली आहे, असे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी सांगितले.