वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
यंदाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा किमान 1 ते 2 महिन्यांनी लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत. मात्र, राष्ट्रपती भवनाकडून निर्देश आल्यानंतरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱयाने नमूद केले. दरवर्षी दि. 29 ऑगस्ट रोजी परंपरेप्रमाणे या सोहळय़ाचे राष्ट्रपती भवनात आयोजन केले जाते. पण, यंदा यावर देखील कोव्हिड-19 च्या महासंकटाचे सावट आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यान चंद पुरस्कारांचा समावेश राहत आला असून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार जेत्यांना गौरवले जाते. हॉकीचे महान जादूगर मेजर ध्यान चंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत दि. 29 ऑगस्ट रोजी हा सोहळा प्रतिवर्षी आयोजित करण्यात
येतो.
‘आम्हाला अद्याप राष्ट्रपती भवनाकडून काहीही निर्देश आलेले नाहीत. क्रीडा पुरस्कार सोहळय़ाबद्दल निर्णय काय होणार, याची आम्हाला प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत नेमके काय होईल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे’, असे क्रीडा मंत्रालयातील पदाधिकाऱयाने वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.
‘सध्या पूर्ण देशातच सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. राष्ट्रपती भवनात देखील आता कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. यापूर्वी, काही वेळा पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर टाकले गेले आहेत. त्यामुळे, यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. जर हा सोहळा दि. 29 ऑगस्ट रोजी झाला नाही तर तो एक-दोन महिन्यांच्या अंतराने होईल. सर्वांची सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची आहे’, असे या पदाधिकाऱयाने स्पष्ट केले.
कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे यंदा पुरस्कार निवड प्रक्रियाच कात्रीत सापडली. प्रारंभी, क्रीडा मंत्रालयाला पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवावी लागली. याशिवाय, लॉकडाऊनमध्ये शिफारस पत्र मिळवण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने खेळाडूंना स्वतः अर्ज करण्याची मुभाही देण्यात आली.
‘आलेल्या अर्जाची छाननी देखील अजून सुरु झालेली नाही आणि या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे. अर्थातच, उशीर होणार, हे निश्चित आहे. पण, पुरस्कार दिले जातीलच. जे खेळाडू, प्रशिक्षक पात्र आहेत, त्यांचा सन्मान रोखला जाणार नाही’, असे या पदाधिकाऱयाने येथे नमूद केले आहे.