स्मार्ट सिटी योजनेच्या रस्त्यांव्यतिरिक्त इतर रस्त्यांचा विकास करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या दक्षिण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांव्यतिरिक्त इतर रस्त्यांचा विकास करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महाद्वार रोड परिसरातील मुख्य रस्त्यासह सर्व क्रॉसच्या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेचा गाजावाजा करून शहरातील अन्य रस्त्यांच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दक्षिण भागातील सर्रास रस्त्यांची वाताहत झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर, वडगाव, टिळकवाडी, महाद्वार रोड अशा विविध भागात वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे बाजारपेठेसह या भागातील समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याचे सांगून महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या विकासाकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
विविध रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, 3 वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेला महाद्वार रोड मुख्य रस्ता खड्डय़ांमध्ये हरवला आहे. रस्त्याच्या विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. डांबरीकरण केलेल्या काही महिन्यातच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यामुळे सदर रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. खोदाई केलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पण ती केवळ नाममात्रच ठरली. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदलेल्या ठिकाणाची डागडुजी करूनही काही महिन्यातच खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कपिलेश्वर मंदिरपासून छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलापर्यंतचा महाद्वाररोड मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
या रस्त्यावर एक ते दीड फुटाचे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. खड्डय़ांमुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. दुचाकी वाहनधारकांना हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. धारवाड रोडला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे अवजड वाहनांसह दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. पण या रस्त्याच्या डागडुजी व दुरुस्तीकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे.
डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदला रस्ता
महाद्वाररोड 1 ते 4 क्रॉसपर्यंतच्या संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने महाद्वार रोडची अवस्था खेडेगावाप्रमाणे झाली आहे. येथील आपटेकर गल्लीतील रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महाद्वार रोडला जोडणाऱया कपिलेश्वर कॉलनीतील रस्ताही पूर्णपणे खराब झाला आहे. एसपीएम रोड ते जुना धारवाड रोडला जोडणाऱया कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी ठेवलेल्या पाईप अडथळा ठरत आहेत. हा रस्ताही डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आला होता. त्यामुळेच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले
आहे.
अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
सध्या खानापूर रोड व काँग्रेस रोडने गोवावेसकडून जुना धारवाड रोडला ये-जा करणारी वाहतूक कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्याने सुरू आहे. महात्मा फुले रोडवरून येणारी सर्व वाहतूक या रस्त्यामार्गे धारवाड रोडला जाते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू असते. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. टँकर, सिमेंट काँक्रीटची वाहतूक करणारी वाहने व इतर अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्याने होत आहे. 20 ते 25 टन वजनाचे साहित्य घेऊन जाणारी 16 चाकी वाहने या रस्त्याने ये-जा करीत आहेत. रस्त्याची क्षमता नसतानादेखील अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने संपूर्ण रस्ता खड्डय़ात गेला आहे. यामुळे दुचाकी आणि लहान वाहनधारकांना तसेच परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील समस्येकडे महापालिका प्रशासनाने पूर्णपणे कानाडोळा केला आहे. या समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन लक्ष देणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.