ऑनलाईन टीम / पुणे :
‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाचे उद्घाटन पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी दीपप्रज्वलन करून आणि पं. भीमसेन जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होत आहे. पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा सन्मान पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आला.
‘कलाकारांना पिढ्यानपिढया सन्मान मिळावा, कला वृद्धींगत होत राहावी, आणि त्यांची मेहनत सुफळ संपन्न व्हावी ‘, अशी सदिच्छा पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी छोटेखानी भाषणात व्यक्त केली.
उद्घाटनप्रसंगी हरिप्रसाद चौरसिया, पं.उदय भवाळकर, पं.विजय घाटेे, पं.उल्हास कशाळकर, पं. विकास कशाळकर, पं.अतुलकुमार उपाध्ये, पुनीत बालन, श्रीकांत बडवे, श्रीपाद चितळे, गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील व्यासपिठावर उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
पंडित भीमसेन जोशी यांनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत अखंडपणे होत असलेल्या ‘ख्याल यज्ञ’ संगीत महोत्सवात देशातील दिग्गज तसेच नवोदित मिळून ३९ कलाकारांचे सादरीकरण होत आहे. ३९ गायक, १४ तबला वादक, १० पेटीवादक, १ सारंगी वादक, ४ निवेदक यांचा सहभाग हे या संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे .
१२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७ वाजता पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनाने या “खयाल यज्ञाची” सुरुवात झाली. राग तोडी, अहिर भैरव मधील बंदिश भुवनेश कोमकली यांनी सादर करून, तर पं. विजय कोपरकर यांनी राग बसंत बुखारी सादर करून रसिकांची मने जिंकली.