शाळांच्या समस्या निकालात काढण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची ग्वाही
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर येथील क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालय आवारात उभारण्यात आलेल्या विज्ञान पार्क तसेच गणित प्रयोगशाळेचे उद्घाटन राज्याचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांच्या हस्ते झाले. सदर विज्ञान पार्क तालुक्यातील विज्ञान शिक्षकांनी आपल्या कल्पक बुद्धीमत्तेतून उभारली आहे. विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन झाल्यावर मंत्र्यांनी विज्ञान पार्कमध्ये फिरून माहिती जाणवून घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.
यानंतर झालेल्या समारंभात बोलताना शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले, गुणात्मक शिक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाबरोबरच राष्ट्रभक्ती आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. त्या दिशेने तालुक्मयातील वंचित शाळांच्या समस्या निकालात काढण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जांबोटी भागातील शाळांचा उल्लेख करताना ते म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतही तेथील शिक्षकांनी प्रयोगशीलता आणि गुणात्मक शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून चिकित्सक वृत्तीचा विकास होण्यासाठी विज्ञान उद्यानासारखे उपक्रम उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना आनंददायी पद्धतीने शिकविण्यासाठी या उद्यानातील प्रयोग प्रभावी ठरतील.
या समारंभाला महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, खानापूर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी, तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वाय. एम. पाटील, माध्यमिक शाळा आणि कॉलेज नोकर संघटनेचे राज्य सचिव सलीम कित्तूर, तालुकाध्यक्ष व्ही. बी. होसूर यासह तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिक्षक भरती, शाळा इमारतींची दुरुस्ती, शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात मागण्यांची निवेदने मंत्री नागेश यांना सादर करण्यात आली.
शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक
खानापूरसारख्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असला तरी गुणात्मक शिक्षणासाठी शिक्षकांनी चालवलेली धडपड कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिक्षण मंत्र्यांनी काढले. विज्ञान उद्यान, गणित लॅब, दृकश्राव्य थिएटर, प्रयोगशील शिक्षण पद्धती उपक्रमांसाठी प्रयत्न केलेल्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.