आमदार अंजली निंबाळकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
खानापूर / प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि महापुरामुळे खानापूर तालुक्यातील रस्ते, पूल आणि बंधाऱयाचे अपरिमित नुकसान झाले आहे. पंचायत राज खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सुविधांच्या पुननिर्माणासाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. सौ. अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी शनिवारी अतिवृष्टी नुकसान आणि कोरोना नियंत्रणाबाबत बेळगाव येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आमदार अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यातील समस्यांकडे लक्ष वेधले. 2019 मध्ये खानापूर शहर तसेच ग्रामीण भागाला अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला होता. त्यावेळी अनेक पूल व रस्त्यांचे अपरिमित नुकसान झाले होते. यावर्षी दि. 21 व 22 जुलै रोजी पुन्हा महापुराचा सामना करावा लागल्याने रस्ते वाहून गेले. तसेच अनेक जुन्या पुलांचे नुकसान झाले. परिणामी अनेक गावची वाहतूक ठप्प झाली. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाल्याने बस वाहतुकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गंभीर समस्येंचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांचे रस्ते उखडून गेल्याने रुग्णवाहिका गावात जाऊन पोहोचणे कठीण झाले आहे. गर्भवती आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत दवाखान्यात दाखल करणे कठीण झाले आहे. या सर्व समस्यांची दखल घेऊन खानापूर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या पुननिर्मितीसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच लोंढा गावातील गांधीनगर वसाहतीला दरवर्षी पांढरी नदीच्या पुराचा फटका सहन करावा लागत आहे. अनेक घरे पाण्याखाली जाऊन कोसळली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही, त्यासाठी जागा आणि घरांच्या उभारणीकरिता निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार अंजली निंबाळकर यांनी केली आहे.