विनाकाम फिरणाऱया दुचाकी स्वारांवर पोलिसांची करडी नजर : वाढत्या रुग्यसंख्येमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत चालला आहे. शहर व तालुक्यात दररोज 20 ते 25 कोरोनाबाधितांची भर पडत असून दररोज 2 ते 3 कोरोनाबाधित दगावण्याच्या घटनाही घडत चालल्याने तालुक्यात आता भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. पण अशाही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून सामाजिक अंतराचा तसेच इतर नियमांचाही फज्जा उडत आहे. यामुळे आता प्रशासनाने शहर व तालुक्यातील लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सोमवारी दुचाकी वाहनांवर अगदी पहाटे 6 वाजल्यापासून पोलीसी कारवाईला प्रारंभ झाला. यासाठी शहराच्या चारही सीमांवर पोलीस बंदोबस्त होता. व एकही दुचाकी वाहन शहरात सोडले जात नव्हते. दिवसभरात पोलिसांनी जवळपास 400 दुचाकी वाहनधारकांवर त्यांची वाहने ताब्यात घेऊन कारवाई केली.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश
या कारवाईमुळे खानापूर शहरातील स्टेशनरोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ येथे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणाऱया गर्दीवर बऱयापैकी नियंत्रण मिळवता आले. खानापूर शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी अशोक तेली, तहसीलदार रेश्मा तालीकोटी, तालुका आरोग्याधिकारी संजय नांदरे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, संगमेश कार्जोळ, नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक यु. एस. आवटी याशिवाय तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स इतर वैद्यकीय कर्मचारी, तालुक्यातील पीडीओ विशेष ऍक्शन मुडमध्ये आले असून त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे.
आता नंदगडमध्ये काही दिवसांपासून संपूर्ण गाव सीलडाऊन केले आहे. यामुळे केवळ मेडिकल स्टोअर्स तसेच दूधविक्री केंद्र नियमांमध्ये सुरू असून इतर सर्व दुकाने बंद आहेत. जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची व्यवस्था नंदगडमधील काही व्यापाऱयांनी केली आहे. आता खानापूर शहरात देखील सोमवारी सकाळी 10 पासून केवळ मेडिकल स्टोअर्स, दूधविक्री केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून, इतर सर्व व्यवहार, दुकाने रविवार दि. 16 मे सकाळी 6 पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गेले दोन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी खानापूरचा स्टेशन रोड, बाजारपेठ आदी परिसरात बरीच गर्दी झाली होती.
पायी जाऊन खरेदी करण्याची मुभा द्यावी
एकदमच सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यावर याचा गैरफायदा काही व्यापारी उचलण्याची शक्यता आहे. त्याऐवजी शहरात दुचाकी बंद करुन केवळ पायी जाऊन खरेदी करण्याची मुभा ठेवल्यास होणाऱया गर्दीवर बरेच नियंत्रण बसू शकेल. तसेच यामुळे सामाजिक अंतर देखील राखता येईल. खानापूर शहर परिसरात विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱया गरिबांना सहा दिवस व्यवहार पूर्णतः बंद ठेवणे परवडणारे नाही. ते दररोज मिळालेल्या मजुरीतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरी ठेवण्यासाठी एकदम खरेदी करणेही शक्य नसते. यामुळे दुचाकीवर संपूर्ण बंदी आणून शहरातील व्यवहार सकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू ठेवावे अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप युवा नेते पंडित ओगले, रवी काडगी तसेच शहरातील काही प्रमुखांनी प्रांताधिकारी अशोक तेली, तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्याशी चर्चा करुन या संदर्भात योग्य मार्ग काढण्याची विनंती केली.
ऑक्सीजन बेडची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचेः
खानापूर शहर व तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यानें त्यांना ऑक्सीजन बेड मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. वेळीच ऑक्सीजन न मिळाल्याने कोरोनाबाधीत दगावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. खानापूरच्या सरकारी दवाखान्यात ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्यात आली असली तरी वाढत्या रुग्णांच्या मानाने ती संख्या अपुरी असल्याने त्याठिकाणी कोरोनाबाधीत हाऊसफुल झाले आहे. यामुळे शहरात आणखी ऑक्सीजन बेडची व्यवस्था करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाची तयारी असली तरी त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स व नर्सची कमतरता असल्याने ऑक्सीजन बेड वाढविणे प्रशासनाला अवघड जात आहे. यासाठी तज्ञ डॉक्टर्स पुढे आल्यास ऑक्सीजन बेडची संख्या वाढवून देण्याची तयारी प्रशासनाने दाखविली आहे. गेल्यावर्षी तालुक्यातील नंदगडजवळील संगोळी रायाण्णा शाळेच्या वसतीगृहात कोरोना हॉस्पीटल करण्यात आले होते. तशा पध्दतीने पुन्हा एकदा खानापूरच्या सरकारी दवाखान्याशिवाय अन्यठिकाणीही कोरोना हॉस्पीटलची उभारणी करावी. अशी मागणी केली जात आहे.