सोलापूर/प्रतिनिधी
खुल्यावर्गातील अनुदानित प्रवेश करतेवेळी विद्यार्थ्यांचा शासन आदेशाचा जी.आर याबाबतीत प्रत्येक कॉलेजमध्ये तंतोतंत 50 टक्के फी माफी अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम यांच्या उपस्थितीत आज बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु होत असल्यामुळे आपण त्यामध्ये विशेष लक्ष देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून आपण सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी 50% फि बाबतीत पुढाकार घ्यावा व शासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांकडून 100% फी आकारु नये, कोरोना महामारीच्या संकटांमध्ये विद्यार्थी व पालक भरडला गेला आहे. प्रवेश करतेवेळी 100% फि न घेता मागणी करण्यात यावी व विद्यार्थ्यांना फी भरणे बाबत विशेष सवलत देण्यात यावी अशा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण या संदर्भात आपल्या विद्यापीठातून आधार मिळेल. कोविड शिक्षण शुल्क नीती अभियान विद्यार्थी मित्रांना फी भरतेवेळी सवलत दिली पाहिजे, कोणतीही फी वाढ करू नये तसेच जे कॉलेज प्रशासन नियम पाळणार नाही त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली.