गडहिंग्लज / जगदीश पाटील
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या विद्यमान बारा संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर परस्पर विरोधी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातून कारखान्याच्या राजकारणाला चांगलीच ‘उकळी’ फुटली असून सुरू असलेला कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्याची कसरत सर्वांनाच करावी लागणार आहे.
गडहिंग्लज साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर 2014 साली ब्रिस्क कंपनीला सहयोगी तत्वावर दहा वर्षासाठी चालवण्यास दिला. त्यावेळी तत्कालीन व्हा. चेअरमन प्रकाशराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. चेअरमन ऍड. श्रीपतराव शिंदे यांना बाजूला ठेवत हा निर्णय झाला. त्यानंतर कारखान्याची निवडणूक लागली. राष्ट्रवादीशी जुळवून घेणाऱ्या व्हा. चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांना अचानक बाजूला करत राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी जुळवून घेवून पॅनेल केले. या पॅनेलची सत्ताही आली. जनता दलाचे केवळ तीन संचालक असताना ऍड. शिंदे यांना मंत्री मुश्रीफ यांनी चेअरमन पदावर बसविण्यात पुढाकार घेतला. हा कारखान्याचा इतिहास. पण अलीकडे ऍड. शिंदे आणि मंत्री मुश्रीफ यांच्यात वितुष्ट तयार झाले. त्यातून आरोप-प्रत्यारोप होत राहिले. याच दरम्यान ब्रिस्क कंपनीने करारातील दोन वर्ष शिल्लक असताना अगोदरच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला आणि कारखान्याची सूत्रे संचालक मंडळाकडे सुपूर्द केली.
कारखान्याची सूत्रे मार्च महिन्यात चेअरमन ऍड. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे आल्यानंतर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रश्न तयार झाला. सुरूवातीस स्वबळावर कारखाना सुरू करण्याचे चेअरमन शिंदे आणि व्हा. चेअरमन संग्रामसिंह नलवडे यांनी जाहीर करत आर्थिक मदतीसाठी प्रयत्न चालविले. विविध आर्थिक संस्था, व्यक्ती यांच्याकडे प्रयत्न होवूनही अपयश आल्यानंतर कारखान्याच्या संचालक मंडळात धुसफूस सुरू झाली. दरम्यान, चेअरमन शिंदे यांनी संचालक अमर चव्हाण, संभाजी नाईक, बाळकृष्ण परीट यांच्या मदतीने स्थानिक पातळीवर प्रयत्न करत निधी उभा केला आणि उशिरा का असेना गडहिंग्लज कारखान्याचा 43 वा गळीत हंगाम सुरू झाला. हंगाम सुरू करताना ‘आम्ही तुमच्या बरोबर आहोत’ अशी भूमिका बऱ्याच संचालकांनी घेतली. पण त्यानंतर एकूण परिस्थिती पाहता राजकारण सुरू झाले.
सुरूवातीस राष्ट्रवादीच्या चार संचालकांसह विरोधी सात संचालकांनी मिळून चेअरमन शिंदे यांच्यावर आरोप करत विश्वासात घेतले जात नाहीत असे सांगणे सुरू केले. याची चर्चा होत असताना कारखाना सुरूच होता. त्यानंतर अचानक विद्यमान बारा संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यावेळी त्यांनी चेअरमन ऍड. शिंदे हे मनमानी कारभार करतात असा आरोप केला. राजीनामा दिल्यानंतर मात्र ऍड. शिंदे त्यांचे समर्थक सक्रिय होत या 12 संचालकांचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी गडहिंग्लजला रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ऍड. शिंदे यांच्यासह विद्यमान संचालक अमर चव्हाण, राष्ट्रवादीचे चंदगड मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, शिवप्रसाद तेली यांनी जोरकस आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पाठोपाठ 12 संचालकांनी पत्रकार बैठक घेत आरोपांना उत्तर देत राजीनाम्याची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही बाजूनी जोरात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने गडहिंग्लजच्या राजकारणाला चांगलीच ‘उकळी’ फुटली आहे. आरोप-प्रत्यारोपामुळे कोण बरोबर ?, कोण चुक ? याचा शोध जनता घेताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप होत असले तरी गडहिंग्लज साखर कारखाना सुरू राहिला पाहिजे अशी भूमिका बऱ्याच शेतकऱ्यांची असल्याचे दिसते आहे. ‘राजकारण काही करा पण कारखाना सुरू ठेवण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करा’ अशी भावना ऊस उत्पादक, कामगार व्यक्त करताना दिसत आहेत. या भावनेचा कसा आदर राखला जातो ? याकडे आता लक्ष लागले आहे.