प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या पारंपरिक श्रीगणेश चतुर्थी उत्सवाची तयारी जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. राज्यात सर्वत्र उत्साह संचारला आहे. बाजारपेठांमध्ये पारंपरिक माटोळीसाठी फळफळावळ तसेच फळभाज्या खरेदीसाठी गोमंतकीयांनी एकच गर्दी केली आहे. सायंकाळी अनेकांनी गणेशमूर्ती घरी नेण्यास प्रारंभ केला. एकंदरीत सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
राजधानी पणजी शहर अर्धे अधिक रिकामे झाले आहे. बहुतांश मंडळी आपल्या मूळ गावात चतुर्थीच्या तयारीसाठी परतली आहे. अनेकांनी बुधवारी गणेशाची मूर्ती आपल्या घरी नेली आहे. घरच्या गणपतीसमोर आरास करण्यासाठी बाल गोपाळांसह घरातील कर्ती मंडळी रात्रभर जागरण करीत असल्याचे दृष्य दिसून आले.
उद्या सकाळपासून गणेशपुजनास प्रारंभ
पारंपरिक गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्या शुक्रवारी सकाळपासून घरोघरी गणरायाच्या पुजेला प्रारंभ होईल. सरकारने भटजीबुवांना घरी जाऊन पूजा करण्यास प्रतिबंध लागू केल्याने बराच गोंधळ उडाला. जनतेच्या दबावामुळे सरकारने तो आदेश तडकाफडकी मागे घेतला. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव बहुतेक ठिकाणी दीड दिवसांचा होईल. शिवोलीत मात्र 11 दिवस व सांखळीत पाच दिवस उत्सव चालणार आहे.
कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येणार
घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने विभक्त कुटुंबे एकत्र येतात. राजधानी पणजी व आसपासच्या भागात रहाणाऱया तसेच काम करणारी मंडळी हळूहळू गावी परतायला लागली. आपल्या मूळ गावात जाऊन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण आपापल्या घरी गेल्याने राजधानी पणजी शहरात गणेशचतुर्थीदिनी म्हणजे शुक्रवारी शुकशुकाट होईल. शनिवारी देखील सामसुम असणार. राजधानी शहर खाली होऊ लागलेय व गावे पुन्हा गजबजू लागतील.
खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी
चतुर्थी उत्सवानिमित्त पणजी, फोंडा, म्हापसा, पेडणे डिचोली, वाळपई, सांखळी, कुडचडे, मडगाव, काणकोण येथील बाजारपेठांमध्ये माटोळीचे सामान खरेदीसाठी नागरिकांनी बुधवारी गर्दी केली. माटोळीला लागणारे सर्व साहित्य बाजारात उपलब्ध होते. मात्र अव्वाच्या सव्वा दरात नागरिकांना साहित्य खरेदी करावे लागले. पणजी बाजारपेठेत आंबे देखील विक्रीस उपलब्ध होते. पणजीचा बाजार बुधवारी गावठी भाज्यांनी गच्च भरून गेला होता. या व्यतिरिक्त काश्मिरची सफरचंद, मोसंबी व अन्य असंख्य फळे विक्रीला उपलब्ध होती. गोव्याबाहेरून मोठय़ा प्रमाणात भाज्यांची आयात झालेली आहे. ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळाले.
फटाक्यांची दुकाने पडली ओस
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी जादा फटाके व दारुकामाच्या आतषबाजीवर खर्च करायचा नाही असे यंदा ठरविले असावे. यंदा फटाक्यांच्या दुकानांवर ग्राहक फारसे फिरकले नाहीत. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जागृकता निर्माण झाली असल्याने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाक्यांचा आवाज कमी येईल, असे वाटते.