प्रतिनिधी / कोल्हापूर
ऑगस्टमधील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन सर्व विभागांनी येणाऱया अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आठ दिवसात विभागनिहाय आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी. पुराचा संभाव्य धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी प्रशासनामार्फत परिस्थितीनुरुप ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येईल. त्याला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. त्यांनी जिह्यातील धरणांचा सध्यस्थितीतील पाणीसाठा आणि गतवर्षीचा पाणीसाठा याबाबत माहिती घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, प्रातांधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जिह्यामध्ये ज्यांच्याकडे बोटी आहेत त्याची नोंद ठेवून यादी बनवावी. जिल्हा परिषद, महापालिका अशा विविध शासकीय यंत्रणांच्या बोटींची दुरूस्ती करून त्या सज्ज ठेवाव्यात. ग्रामीण भागात विशेषतः शिरोळ तालुक्यात गेल्या महापुरात बोटींबाबत काही अडचणी आल्या होत्या. त्याबाबत तयारी ठेवावी. महसूल, आरोग्य, पुशसंवर्धन, महावितरण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कृषी अशा सर्वंच विभागांनी आदर्श कार्यप्रणाली तयार ठेवावी, अशी सुचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पाटबंधारे विभागाने जूनच्या आत धरणांच्या दुरूस्तीबाबत विशेषतः फाटकवाडी, बर्की, धरणाच्या दुरूस्तीची प्रलंबित कामे पूर्ण करावीत. पडणाऱया पावसाबाबत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत स्वतंत्रपणे एफएम वाहिनी सुरू करण्याचा विचार आहे. सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकाऱयांनी गेल्यावेळी आलेल्या अडचणींबाबत, अल्पमुदतीत उपाययोजनांबाबत सविस्तर अहवाल तयार करावा. कमी कालावधीत जादाचा पाऊस गतवर्षी पडला होता. त्याबाबत पाटबंधारे विभागाने आगाऊ सूचना देण्याबाबत नियोजन करावे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सुचित केले.
संभाव्य पूरस्थितीच्या तालुक्यात हेलिपॅड तयार करा
कर्मचाऱयांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. शिरोळ, करवीर, राधानगरी आदी तालुक्यात योग्य ठिकाणे शोधून हेलिपॅड तयार करावीत, पशुसंवर्धन विभागाने जिल्हा दूध संघामार्फम जनावरांचे सर्वेक्षण करावे. पाटबंधारे विभागाने 2005 आणि 2019 च्या महापुराचा अभ्यास करून नियोजन करावे, 43-44 फूट पातळी झाल्यास नागरिकांचे सक्तीने स्थलांतर करावे, मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी ठेवावी. खासगी रूग्णालयांनी धोका पातळी पूर्व रूग्ण दाखल करून घेऊ नये. बोटींची संख्या वाढवावी. मोठी रूग्णालये, मोठय़ा गृहनिर्माण संस्थांनी स्वतंत्र बोटीची व्यवस्था करावी, अशा सुचनाही पालकमंत्री पाटील यांनी केल्या.