वार्ताहर/ औंध
वर्षानुवर्षे खटाव तालुक्याचे नेते म्हणून मिरवणाऱया लोकप्रतिनिधींना गावोगावी विकासकामे करता आली नाहीत. निवडणूका झाल्या कि तालुक्याचे तथाकथित तारणहार जनतेपासून लांब जात गायब होतात. जनतेने विश्वासाने मला निवडून दिल्यानंतर तालुक्यातील गावोगावी विकासपर्व उभे राहू लागले आहे. आगामी काळात होणाऱया ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकीत जनतेने गावच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोण असणारे लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
लोणी (ता.खटाव) येथे 1 कोटी 40 लाखांच्या रस्त्याचे तसेच अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहाजी देशमुख, सोमनाथ भोसले, निलेश फडतरे, सरपंच सुरेश शिंदे, उपसरपंच उषा फडतरे, अशोक जाधव, तानाजी शिंदे, शंकर भोसले, सुधीर शिंदे, अमोल शिंदे, शहाजी जगताप, प्रमोद शिंदे, रामचंद्र भोसले, दत्तात्रेय माने, सुहास माने, नवनाथ काळे, संभाजी देवकर, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आ. गोरे पुढे म्हणाले, गेल्या 40 वर्षात खटाव तालुक्यातील गावांना पाणी नव्हते, मूलभूत विकासकामांचा पत्ताच नव्हता. चांगली आणि सक्षम माणसेच निवडून दिली जात नव्हती. ज्यांना निवडून दिले त्यांनी जिरवा जिरवीचे राजकारण करुन फक्त स्वतःचा स्वार्थ साधला. मागील दहा, बारा वर्षांपासून परिस्थिती बदलत आहे. उरमोडीचे पाणी आले आहे. गावागावात पाणी अडविणाऱया सिमेंट बंधाऱयांची साखळी उभी राहिली आहे. गावा गावांना जोडणारे कोटय़वधींचे दर्जेदार रस्ते तयार होत आहेत. गावच्या मूलभूत विकासाची कामे मार्गी लागत आहेत. जिहेकठापूरचे पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यात साखर कारखाने सुरु झाले आहेत.
आ. गोरे पुढे म्हणाले, बसायला लावलेल्या बैलाला जसा बाजार दाखवतात तसे काम न करणाऱयांना जनतेने घरी बसवले पाहिजे. विधानसभा निवडणूकीत खटाव आणि माण तालुक्यातील सगळे विरोधक एकवटले होते. पायाला भिंगरी बांधून फिरताना त्यांनी जनतेला विकासाची स्वप्ने दाखवली होती. 88 हजार मते घेऊन आता सगळे गायब झाले आहेत. त्यांना कुणालाच तालुक्याच्या विकासाचे, पाणी प्रश्नाचे काहीच देणेघेणे नाही. घर चालवायला जसा कर्ता माणूस सक्षम लागतो तसेच गाव चालविणारे लोकप्रतिनिधीही सक्षम निवडा असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला किरण देवकर, अनिल माने, मनोज शिंदे, संतोष हजारे, मोहन वाघ, जगन्नाथ घाडगे, विठोबा फडतरे, मारुती फडतरे, विवेकानंद फडतरे, भिमराव पाटोळे, महेश शिंदे, विजय शिंदे, उत्तमराव शिंदे, मोहन गायकवाड, पंढरीनाथ शिंदे, विशाल शिंदे, संदीप जगताप, गणपत कदम, चंद्रकांत फडतरे, सागर मोरे उपस्थित होते.