प्रतिनिधी / कोल्हापूर
गावोगावी, शहरे – नगरे फिरून जगाचे भविष्य सांगणाऱ्या नंदीबैलवाल्या कुटुंबीयांचे संचार बंदीच्या परिस्थितीत मात्रहाल होत आहेत. मूळच्या बारामती येथील ढवळ्या नंदी बैल वाला कुटूंबिय पारंपरिक व्यवसायाकरता करवीरनगरीत आले. गेली अनेक वर्षे त्यांचे कुटुंबीय येथे वास्तव्य करीत आहेत. नंदीबैलाचा खेळ करून सुगीच्या काळात धान्य, मसाले, कांदे-बटाटे, चटणी व काही रक्कम गोळा करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या या पारंपरिक कलाकारांना कोरोनारुपी महामारीच्या संकटामुळे आपल्या झोपड्यांमधून बाहेर पडता आलेले नाही.
क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील गंगाई लॉन जवळच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या २० हून अधिक झोपड्यांमध्ये २०० नागरिकांचे संचारबंदीच्या या काळात अन्न पाण्याविना हाल होत आहेत. तसेच त्यांच्या दहा नंदी बैलांना वैरण- चारा नसल्यामुळे त्यांच्यावरही तडफडण्याची वेळ आली आहे. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना आता मात्र स्वतःच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. शहरातील विविध दानशूर व्यक्ती, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटूंबियांना एक महिन्याचे अन्नधान्य देणे गरजेचे बनले आहे. या सोबत वृद्ध आणि बालकांवर औषधोपचार होणेही गरजेचे आहे.तसेच बैलांना चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा अन्नपाण्याविना त्यांना प्राण सोडावा लागणार आहे.