प्रतिनिधी/ सातारा
गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील कॉलेज परिसरात युवकांच्या टवाळक्या वाढल्या आहेत. महाविद्यालयीन युवकांच्या गटातटात मारामारीच्या घटना घडू लगल्या आहेत. युवतींच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. त्या पार्श्वभुमीवर बुधवारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुचाकीवरुन अचानकपणे कॉलेजच्या आवारात व्हिजिट दिली. कॉलेज परिसरात जाऊन महाविद्यालयीन युवतींना कोणाचा त्रास होतो काय?, पोलीस फिरतात का अशी विचारणा केली तर विनाकारण कॉलेजच्या आवारात आलेल्या युवकांना बरोबर गाठून त्यांनी सज्जड दमही भरला. दरम्यान, पोलिसांची मात्र यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती.
सातारा शहर व जिह्यातील महाविद्यालयांमध्ये सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. याच काळात काही टवाळखोर युवकांकडून वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. राडेबाजीच्या घटना घडत आहेत. त्यावरुन बुधवारी सकाळी मोजक्याच पत्रकारांना सोबत घेऊन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या यामाहा दुचाकीवरुन थेट कॉलेजच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांनी पोलिसांचा ताफा सोबत घेतला नव्हता. येथील स्व. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या परिसरात त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीनींशी संवाद साधला की येथे कोणी त्रास देते का?, पोलिसांची गस्त असते काय?, त्यावर त्यांना त्या विद्यार्थींनी पोलीस साध्या वेशात फिरतात, असे सांगिततले. तर कॉलेजच्या बाहेर एक युवकांचा ग्रुप त्यांना दिसला त्या ग्रुपमध्ये जाऊन दोन बाहेरच्या कॉलेजच्या युवकांना कशासाठी आला आहे, आयडेंटी कुठं आहे अशी प्रश्नांची सरबत्ती करताच तेही विद्यार्थी क्षणभर चाचपडले, गळय़ात आयडी नव्हते, साहेब फॉर्म भरायला आलोय असे खोटे उत्तर दिल्याचे निदर्शनास येताच मंत्री शंभूराज देसाई यांनी त्या युवकास पुन्हा असे करु नको. पुन्हा आलास तर पोलीस कारवाई करतील, अशा शब्दात त्यास सुनावत एकुणच सातारा शहरातील महाविद्यालयाच्या परिसरात अचानक फेरफटका मारुन त्यांनी तपासणी केली.