सत्ताधाऱ्यांनी सभेत उत्तर द्यावे विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
सत्तांतरानंतर गोकुळमध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार सुरु आहे. केवळ चार महिन्यात चुकीच्या कार्यपद्धतीमुळे संघाला 55 कोटींचा भुर्दंड बसला आहे. असा आरोप विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱयांनी याचे उत्तर द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. रायगड, मुंबईतील जागा खरेदी विचारपूर्वक गरज ओळखून झाली पाहिजे, यासाठी ऑफलाईन सभेत खुली चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी संचालक रणजीत पाटील, धैर्यशील देसाई, रवीश पाटील उपस्थित होते.
महाडिक म्हणाल्या, विद्यमान सत्ताधारी मंडळींच्या कारभाराचे वाईट परिणाम पुढच्या आर्थिक वर्षात दिसून येतील सत्तेतील आपल्या सहकारी सदस्यांनी चुकीच्या निर्णयांचे परिणाम लाखो दूध उत्पादकांना भोगायला लावू नयेत. अनेक जेष्ठ संचालकांच्या दूरदृष्टी, अपार कष्टातून निर्माण झालेल्या गोकुळला भोगावे लागणार आहेत हे लक्षात असू द्या. गोकुळ मधील सर्वच संचालक हे सभासदांनी निवडून दिले आहेत. अध्यक्ष हे सर्वच सदस्यांचे प्रतिनिधत्व किंवा नेतृत्व करतात. ते फक्त नेतृत्वच करतात. संचालकांचे किंवा संस्थेचे ते मालक नाहीत याचे त्यांनी भान ठेवावे. असे आवाहन केले.
रायगड, वाशी येथील जागा खरेदी अव्यवहार्य
रायगड, वाशी येथील जागा खरेदी अव्यवहार्य आहे. दोन्ही व्यवहार करण्याचा निर्णय एकाच वेळी घेण्यात येत आहे. भोकरपाडा येथे विस्तार करायचाच आहे तर मग वाशी येथे जागा घेण्याचा घाट कशासाठी घातला आहे. असा सवाल केला. अतिरिक्त जागेच्या खरेदीमुळे 30 कोटी रुपये अनुत्पादित गुंतवणूक होणार आहे. जागा आणि बांधकाम तसेच यंत्र सामुग्रीसाठी होणाया 300 कोटी इतक्या रक्कमेवर 45 कोटीचा वार्षिक हप्ता येणार आहे. एकूण 70 कोटी रुपये व्याजासाठी जाणार आहेत. याशिवाय व्यवहारातील खर्चात वर्षाला सुमारे 15 कोटींनी वाढ होणार आहे. सध्याच्या काळात एकाचवेळी इतका सगळा खटाटोप म्हणजे नालेसाठी घोडा खरेदी करण्यासारखे आहे. अशी टिका केली. हे सर्व नियोजन करत असताना मुंबई मधील वितरण आणि विक्रीची घडी देखील विस्कळीत होणार आहे हे वेगळेच. पुणे येथील पॅकेजिंग चा ठेका रद्द करण्याचा निर्णय हा त्या कंपनीचे संचालक हे महाडिक यांचे जावई आहेत या निव्वळ एका आकसापोटी घेण्यात आला.
वाहतुक खर्चाचा अतिरिक्त ताण संघावर
कोल्हापुरात पॅकेजिंग करून इन्सुलेटेड वाहनाद्वारे पुणे येथे वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वाहतुक खर्चाचा अतिरिक्त ताण संघावर पडणार आहे. या शिवाय पुणे येथील दूध वितरणामध्ये गुणवत्तेसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. निव्वळ महाडिकांना विरोध म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. हीच बाब महाडिकांच्या दूध वाहतुकीतील टँकरच्या ठेक्याबाबत आहे. महाडिक म्हणून विशेष दर किंवा विशेष सवलत दिली किंवा घेतलीही जात नाही. संकलन वाढीसाठी ठोस उपाय योजना करण्यापेक्षा बाहेरील राज्यातून दूध खरेदी केली जात आहे. या दुधाचा खरेदी आणि प्रक्रिया खर्च जास्त आहे. तसेच हे दूध लांबून येत असल्याने या दुधाचा नैसर्गिक दर्जा टिकत नाही. बाहेरील राज्यातील म्हैस दूध खरेदीत गोकुळ चे मोठे नुकसान आहे. असा आरोपही त्यांनी केला.
असा झाला तोटा
महानंद मध्ये पॅकेजिंग सुरु केल्याने- 11 कोटी 95 लाख
कोल्हापूर विभागात विक्रीची दरवाढ लागू न केल्याने 10 कोटी 58 लाख
प्रभात डेअरी मध्ये दही पॅकेजिंग सुरु केल्याने 23 लाख 72 हजार
पुण्यातील पॅकिंग बंद केल्याने 12 कोटी 77 लाख
बाहेरील राज्यातून दूध खरेदीमुळे 7 कोटी
नव्या प्रकल्पासाठीच्या कर्जावरील व्याज 8 कोटी 23 लाख
मोडलेल्या भांडवली उत्पन्नवरील व्याज 3 कोटी 78 लाख
पहा सविस्तर काय म्हणाल्या शौमिका महाडिक खालील लिंकवर