अरविंद केजरीवाल यांचा दावा : भ्रष्टाचाऱयांवर योग्य ती कारवाई करणार : गोमंतकीयांसाठी मोफत तीर्थयात्रा
प्रतिनिधी /पणजी
खाण व्यवसायातील भ्रष्टाचारासह गोव्यातील सर्व स्तरातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करून भ्रष्टाचाऱयांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार तसेच यापुढील गोव्यातील सरकार आम आदमी पक्षाचेच असेल व हे सरकार भ्रष्टाचारमुक्त असेल, अशी घोषणा आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
आपचे सरकार आल्यास जनतेला कोणता लाभ मिळेल याची हमी वचने दर महिन्याला आपच्यावतीने जाहीर केली जात असून प्रत्येक कुटुंबाला 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची पहिली घोषणा, खाण पीडितांना खाणी सुरू होईपर्यंत दरमहा 5 हजार रुपये, प्रत्येक बेकार तरुणाला रोजगार मिळेपर्यंत दर महा 3 हजार रुपये देण्याच्या घोषणा केजरीवाल यांनी यापूर्वी केल्या आहेत.
सोमवार दि. 1 नोव्हेंबर रोजी गोव्यात आल्यावर त्यांनी चौथी हमी जाहीर केली. त्यात प्रत्येक नागरिकाला गोवा सरकार मोफत देवदर्शनाला पाठवणार, त्यात शिर्डी, अयोध्या, वेलंकिनी व अजमेर शरीफ दर्गा या स्थळांचा समावेश असेल. वातानुकूलित रेल्वे प्रवासासह निवास, जेवण, बोर्डिंग लॉजिंग आणि इतर व्यवस्थेसह संपूर्ण खर्च सरकार उचलेल, अशी योजना तयार केली जाईल, असे ते म्हणाले.
देवदर्शन हे मनःशांतीसाठी असते, असे सांगताना गोव्यात लाखो पर्यटक येतात, गोमंतकीयांना पर्यटनाची संधी देण्यासाठी तीर्थयात्रेचे नियोजन केल्याचे ते म्हणाले. पर्यटन धरून प्रत्येक क्षेत्रासाठी आम आदमी पक्ष नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपचे सरकार येताच भ्रष्टाचार करणाऱया एकालाही सोडणार नाही. भाजप आणि काँग्रेस भ्रष्टाचाराबाबतीत एकमेकांची पाठराखण करतात. भ्रष्टाचाऱयांना दोषी धरल्याचे एकही उदाहरण गोव्यात नाही. भ्रष्ट लोकांवर कारवाई करून लवकरात लवकर पैसे वसूल केले जाईल, त्यात खाण व्यवहारातील भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले.
युती व विधानसभा मतदारसंघ वाटणीसंबंधी त्यांना विचारले असता पुढील गोवा भेटीत यावर खुलासा केला जाईल, असे ते म्हणाले. रोजगार गॅरन्टी प्रोग्रॅमालाही 1 लाख 12 हजार युवकांनी नोंदणी केली आहे. गोव्यातील स्थानिकांसाठी 80 टक्के नोकऱया राखीव ठेवण्याचा कायदा केला जाईल, असे ते म्हणाले.
पर्यटनावर अवलंबून असलेल्या ज्या कुटुंबियांनी कोविडमुळे नोकऱया गमावल्या त्यांचा रोजगार पूर्व पदावर येईपर्यंत त्यांना दरमहा 5 हजार रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर भाजप हायकमांडने डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर कारवाई करायला हवी होती, असे ते म्हणाले.