संजय नाईक यांची मागणी
वार्ताहर / सावंतवाडी:
ग्रामीण भागातील बेरोजगार, कामगार, मजूर किवा पेशंट वर्गातील नागरिकांची कोरोना काळात बिकट अवस्था झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न असावेत. पण शासनाने गोव्यातून ये-जा करणाऱयांसाठी ओळखपत्रे ही स्थानिक ग्रामपंचायत किवा तलाठी कार्यालयात उपलब्ध करून द्यावीत. तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कोणत्या स्वरुपात असावी, हेदेखील जाहीर करावे, अशा मागणीचे पत्र भाजप जिल्हा सहसचिव संजय नाईक यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व सीमावर्ती भागातील असंख्य नागरिक हे गोव्यात रोजगारासाठी जात असतात. काही ठराविक लोक रोजंदारीसाठी जाणारे आहेत. ज्यांच्याकडे कामाचे सबळ पुरावे नाहीत, त्यांचाही विचार करावा. व्यवसाय, बांधकाम, रंगकाम, घरकाम करणाऱयांनाही पास उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
एकतर सीमावर्ती भागात उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे लोकांना पूर्णपणे गोव्यावरच अवलंबून राहावे लागते. अशा लोकांना ओळखपत्र न मिळाल्यास उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळेच रोज ये-जा करणाऱयांसोबतच अन्य कामासाठी ये-जा करणारे तसेच जे दवाखान्यात पेशंट घेऊन जातात त्यांना आडकाठी करू नये, यासाठी व्यवस्था करावी, असेही नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.