मंत्री प्रियांक खर्गे यांची माहिती : भाजपने जारी केलेल्या जनविरोधी कायद्यांमध्ये दुरुस्ती करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील भाजप सरकारच्या काळातील वादग्रस्त निर्णयांचे पुनरावलोकन केले जाईल. पाठ्यापुस्तक दुरुस्ती, गोहत्या बंदी कायदा, धर्मांतर बंदी कायदा मागे घेऊन कायदा दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली आहे. कोणतीही संघटना किंवा व्यक्ती कोणत्याही समाजाची असो, जातीय द्वेष भडकविणाऱ्यांना चाप लावण्यात येईल. याद्वारे कर्नाटकाला नंबर वन राज्य बनविण्यात येईल, असेही प्रियांक खर्गेंनी स्पष्ट केले. ते विधानसौध येथे बुधवारी पत्रकारांशी बोलत होते.
भाजपने अनेक जनविरोधी कायदे जारी केले आहेत. हे कायदे मागे घेण्यात येतील. धर्मांतर बंदी कायदा आणि गोहत्या बंदी यासह राज्याच्या विकासात अडथळे आणणारे कायदे मागे घेण्यात येतील. समाजात कायदा आणि पोलिसांची भीती नसल्यासारखी परिस्थिती आहे. तीन वर्षांपासून ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यावर आपले सरकार चाप लावेल. शांततेला बाधा पोहोचविणारी संघटना कोणतीही असो, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भाजप नेत्यांना हे मान्य नसेल तर ते पाकिस्तानात जाऊ शकतात. समाजात सर्वांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, अशा कायद्यांची आपल्याला गरज आहे. नागपूरहून आदेश येणारा कायदा आपल्याला नको, अशी टिप्पणी त्यांनी केली.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला विरोधी बाकावर बसविण्याचे कारण काय?, याचा अर्थ प्रत्येकाने जाणून घ्यावा. भगवेकरण चुकीचे असल्याचे आम्ही सांगितले आहे. सर्वांना स्वीकारार्ह असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या तत्वांचे अनुकरण काँग्रेस करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप सरकारच्या काळातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस नेत्यांनी केली होती. त्यापाठोपाठ प्रियांक खर्गेंनी भाजप सरकारने जारी केलेले वादग्रस्त कायदे मागे घेणार असल्याचे सांगितल्याने सर्वत्र उलटसुलट चर्चेला उत आला आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणार!
पाठ्यापुस्तक दुरुस्तीवेळी अनेक त्रुटी राहिल्या आहेत. येत्या दिवसांत आक्षेपार्ह मुद्दे वगळण्यात येतील. राज्यातील जनतेच्या हिताविरुद्ध असणारे कायदे मागे घेतले जातील. भाजपने पाठ्यापुस्तक दुरुस्तीवेळी इतिहासात फेरफार केला आहे. उरीगौडा-नंजेगौडा ही काल्पनिक पात्रे जनतेसमोर आणली आहेत. शालेय मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल, अशी वातावरण निर्माण केली जाईल, असेही मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले.