खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य शासनाने गो-हत्या बंदी कायदा विधीमंडळात मंजूर केल्याने खानापुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच ंिहंदूनिष्ठ कार्यकर्त्यांच्यावतीने शिवस्मारकाच्या आवारात आनंदोत्सव व्यक्त करण्यात आला.
प्रारंभी बजरंग दलाचे तालुका प्रमुख नंदकुमार निट्टूरकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत करुन गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला गो-हत्या बंदी कायदा कर्नाटक राज्यात अंमलात आल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला. यानंतर गो मातेची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गो मातेला वंदन करुन तिच्या रक्षणासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे वचन घेतले.
यावेळी बोलताना भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले, कर्नाटक राज्यात केवळ मताकडे लक्ष देवून काँग्रेस शासनाने गो-हत्या बंदी कायदय़ाकडे दुर्लक्ष केले होते. पण आता मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी गो-हत्या बंदी कायदय़ाची अंमलबजावणी करुन समस्त हिंदू धर्मियाना न्याय दिला आहे. या पूर्वी भाजपचे संस्थापक शाम प्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांनीसुद्धा संपूर्ण देशात गो-हत्या बंदी कायदा अंमलात आणावा यासाठी भगिरथ प्रयत्न केले. या मागणीसाठी 1966 साली देशातील साधू संतानी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले. त्या वेळच्या काँग्रेस शासनाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्या साधूसंताचा शाप आज काँग्रेस पक्षाला लागला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, राजू रायका, बाळासावंत सावंत यांनी कर्नाटक राज्य शासनाचे अभिनंदन करणारी भाषणे झाली. यावेळी अमोल परवी, रोशन सुतार, किरण तुडवेकर, राजू गावडे, संजू मयेकर, किरण अष्टेकर, महेश गुरव, रोहित गुरव, महादेव हरिबोल, दत्ता वंजारे यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.