मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांचा सत्कार
प्रतिनिधी /पणजी
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही मतदारासंघात कमळ फुलवा आणि त्याची तयारी आतापासूनच करा. तसेच 2027 च्या विधानसभा निवडणुकीत 27 प्लस जागा निवडून आणुया आणि आता मे महिन्यात होणाऱया पंचायत निवडणुकीत पक्षाचे बळ वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
पणजीतील गोमंतक मराठा समाज सभागृहात काल शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात भाजप आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांचा प्रदेश भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सावंत बोलत होते.
कार्यकर्त्यांच्या कष्टांवर भाजप विजयी
मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपचे सरकार आले. भाजपला निवडणुकीत चांगले यश मिळाले. यात बुथांवरील समान्य कार्यकर्त्यांचेही योगदान आहे. मतविभाजन झाले म्हणून भाजप जिंकला नाही, तर कार्यकर्त्यांच्या कष्टांवर भाजपचा विजय झाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला.
सरकार-पक्षसंघटनेतील समन्वय महत्वाचा
गेल्या 2012 पासून गोव्यात भाजपचे सरकार असून आता 2022 मध्ये भाजपची तिसरी कारकीर्द सुरू होत असून 2027 मध्ये 15 वर्षे पूर्ण होतील, असे सांगून भाजपची तसेच जनतेची अपेक्षा वाढली आहे. सरकार व पक्ष संघटना यात समन्वय साधणे महत्त्वाचे आहे. तो सर्वांनी कायम राखला पाहिजे. पुढील 2027 मध्ये आता ज्या जागा जिंकल्या, त्या ताब्यात ठेवूनच हरलेल्या जागाही जिंकायला हव्यात. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्ला डॉ. सावंत यांनी दिला.
काही मतदारसंघ थोडक्या मतांनी हातातून निसटले. त्यांची कारणे तपासण्याचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून डॉ. सावंत यांनी सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी प्रास्ताविक व स्वागत पेले. यावेळी सभापती रमेश तवडकर उपस्थित होते.
काँग्रेसने केलीय अध्यक्षपदाची पावणी : तानावडे
काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदाची पावणी केली, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी करून त्या दोन्ही अध्यक्षांना पेडणे ते काणकोणपासून कोण ओळखतो तर सांगा. याउलट तानावडे यांना चाळीसही मतदारासंघातील बूथवरील कार्यकर्ते ओळखतात, असा दावा तानावडे यांनी केला. फक्त पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेल्या माणसाला अध्यक्षपद दिले जाते याचा अर्थ त्या पदाची पावणी करून टाकण्यात आल्याचे तानावडे म्हणाले. यावेळी संघटनमंत्री सतिश धोंड यांनीही कॉँग्रेसवर सडकून टीका केली.