संघटन मंत्री अशोक देसाई यांचा सवाल
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी माजी मंत्री व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना पाटील यांच्या मंत्रिपद काळात शून्य टक्के विकास झाला असे तारे तोडलेत. मुळात कोल्हापूरसाठी आजवरच्या इतिहासात कुणी केलं नाही इतकं पाटीलयांच्या माध्यमातून विकासात्मक काम झालं आहे. हे पवारांनी ध्यानात घ्यावे. पाटीलयांच्या बोलणारे हे कोण, त्यांना नैतिक अधिकार पोहचतो काय असा सवाल भाजपचे संघटनमंत्री अशोक देसाई यांनी पत्रकातून केला आहे.
काल परवा पाटीलयांच्या विकास मुद्यावर टीका करणारे संजय पवार भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना किती वेळा चंद्रकांत पाटील यांच्याकडे यायचे ? संजय पवार यांना कोणामुळे महामंडळ उपाध्यक्ष पद मिळाले ? संजय पवारांचे ऑफिस कोणामुळे पूर्ण झाले ? हा इतिहास त्यांनी तपासण्याची गरज आहे. असे प्रश्न देसाई यांनी पत्रकातून विचारले आहेत. दर महिन्याला पाटीलयांच्या फेऱ्या मारणाऱ्यांनी आत्ता असे बोलणे म्हणजे `चोराच्या उलट्या बोंबा होय’. अशी सडकून टीकाही देसाई यांनी केली आहे.
संजय पवार भारतीय जनता पार्टी संपत चालती आहे. असे म्हणत असतील तर त्यांना बहुतेक महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे आकलन नाही असे म्हणावे लागेल. कारण मागील विधानसभेवेळी भारतीय जनता पार्टीचे 122 आमदार निवडून आले तर यावेळी निम्म्या जागा लढवून 105 आमदार निवडून आले आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे भाजपा संपत चालली आहे. असे संजय पवार म्हणत असतील तर तो विनोद होईल.
कोल्हापूरच्या मानगुटीवर बसलेला बहूचर्चित टोल, विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे स्टेशन, पोलीस प्रशासनासाठी, कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी त्याचबरोबर जुन्या तालीम संस्था नूतनीकरण व त्यांच्या पुनर्बांधणी साठी सढळ हाताने मदत केली. गोरगरीब, वृद्ध व अनाथ लहान मुलांच्या आरोग्यासाठी तसेच शेकडो ऑपरेशनसाठी पाटील यांनी ‘कुणाच्या’ खिशात हात घातला नाही. अनेक खेळाडूंना सर्व प्रकारच्या मदतीने त्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकायला हवी ती मदत केली आहे.याचा विसर पवार यांना पडलेला दिसतो. असे पत्रकात म्हटले आहे.
.