सांगोल्यात दोघांचा बळी : अतिक्रमण, निकृष्ट कामामुळे बळी गेल्याचा आरोप
प्रतिनिधी / पंढरपूर
मुसळधार पावसाने चंद्रभागेच्या तिरावरील कुंभार घाटानजीकची नवीन घाटाची भिंत कोसळल्याने ढिगाऱयाखाली अडकून तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्यानंतर सुमारे दोन तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू होते. सदरच्या मृतांमध्ये दोन वारकऱयांचा समावेश आहे. सांगोल्यातही दोघांचा मृत्यू झाल्याने पावसाने 8 जणांचा बळी घेतला आहे.
बुधवारी दिवसभर पंढरपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशातच कुंभार घाटानजीक नव्याने बांधलेल्या घाटाचा एक भाग कोसळला. या घाटाच्या पायथ्याशी एक कुंटुब झोपडे करून राहत होते. तसेच बुधवारच्या पावसात काही भाविक आसरा घेण्यासाठी याठिकाणी थांबले होते. दरम्यान, दुपारी 2.30 च्या सुमारास अचानक घाटाच्या भींतीचा एक भाग कोसळला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गोपाळ लक्ष्मण अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव, राधा गोपाळ अभंगराव, पिल्लू उमेश जगताप व इतर दोन महिला भाविकांचा समावेश आहे.
दुर्घटनेनंतर तत्काळ स्थानिक तरुणांनी हाताने दगड आणि मातीचे ढिगारे वेगळे करण्यास सुरुवात केली. यानंतर तत्काळ प्रशासकीय यंत्रणेतून जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. चंद्रभागेच्या तिरावर गत दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातून 20 कोटी रुपये खर्चून घाट बांधणी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कुंभार घाटाशेजारी भव्य घाट बांधण्यात आला. संबधित घाटाचे काम हे जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात येत होते. जुन्या पद्धतीचे दगड आणि चुनखडी वापरून हे काम करण्यात आले. नवीन घाट बांधणी निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे झाल्या. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. मृतांच्या वारसांना 4 लाखांची मदत सदर घटनेत मृत झालेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच संबधित घाट उभारणी केलेल्या कामांची तसेच ठेकेदाराची लवकरच चौकशी करून कारवाई करण्यात येईल., अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.