ऑनलाईन टीम / मुंबई :
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ताशी 125 किमी वेगाने हे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंतच्या सर्व जिल्ह्यांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी. पुढील 2 दिवस महत्वाचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात शिथिल केलेले निर्बंध उद्या बंद राहणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
ठाकरे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळ उद्या दुपारी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंत्रणा सज्ज झाल्या असून, NDRF तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, वाऱ्याचा वेग खूप असेल. ताशी 125 किमी वेगाने हे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंतच्या सर्व जिल्ह्यांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी. पुढील 2 दिवस महत्वाचे आहेत. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर कोणीही जाऊ नये. स्थलांतर करण्याची वेळ आलीच तर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
वादळामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू एका ठिकाणी ठेवा. बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू चार्ज करून ठेवा. महत्वाची कागदपत्रे संभाळून ठेवा.वादळ आता आपल्या उंबरठ्यावर आले आहे. मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, लॉकडाऊन काळात शिथिल केलेले निर्बंध उद्या बंद राहणार आहेत. बिकेसीतील रुग्णांना खबरदारी म्हणून दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
वादळाच्या काळात न्यूज चॅनेल आणि रेडिओवर बातम्या ऐका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. घरातील लाईट बंद ठेवून दारे, खिडक्या उघड्या ठेवा. घरातील सुरक्षित रूममध्ये रहा, असे आवाहन ठाकरे यांनी जनतेला केले आहे.