ऑनलाईन टीम / तेहरान :
चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पातून इराणने भारताला वगळल्याचे वृत्त इराणने फेटाळले आहे. चाबहार-जाहेदान रेल्वे प्रकल्पासंबंधी भारत आणि इराणमध्ये कोणताही करार झालेला नाही, केवळ गुंतवणूकीसाठी दोन कायद्यावर स्वाक्षऱ्या झाल्याचे स्पष्टीकरण इराणच्या पोर्ट्स ऍण्ड मेरिटाईम ऑर्गनायझेशनचे डेप्युटी फरहाद मोंतासिर यांनी दिले.
मोंतासिर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, इराणने भारतासोबत चाबहार-जाहेदान रेल्वे मार्ग उभारण्यासाठी कोणताही करार केलेला नाही. भारताने ज्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये बंदरातील यंत्रणेबाबतचा एक करार आहे, तर दुसरा करार भारत बंदरातील विविध कामांत 150 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार असा आहे, त्यामुळे भारताला चाबहार ते जाहेदान हा 628 किमीचा रेल्वे मार्ग उभारणीच्या प्रकल्पातून बाहेर काढण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे मोंतासिर यांनी म्हटले आहे.
चाबहार ते जाहेदान हा 628 किमीचा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जाणार आहे. इराण रेल्वे आणि इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेड हा रेल्वे मार्ग उभारणार होते. त्यासाठी दोन्ही देशात करार झाला होता. मात्र, इराणने आता स्वतःच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे. इराण रेल्वे या प्रकल्पासाठी त्यांच्या राष्ट्रीय विकास निधीची मदत घेणार आहे, असे वृत्त भारतीय मीडियात प्रसिद्ध झाले, हे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे, असे मोंतासिर यांनी स्पष्ट केले.