कॅबिनेट मंजुरीशिवाय कायद्यांची निर्मिती अन् होतात रद्द
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केवळ भाजप सरकारमध्येच कॅबिनेट मंजुरीशिवाय कायदे तयार केले जातात आणि रद्द करण्यात येतात असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात घटनात्मक प्रक्रियेच्या अंतर्गत हे कायदे संपविले जाणार असल्याचे म्हटले होते.
चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजप अध्यक्षांवरही निशाणा साधणारा ट्विट केला आहे. गृहमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या घोषणेला साहसी पाऊल ठरवत कौतुक केले होते. तर संरक्षणमंत्र्यांनी शेतकऱयांचे कल्याण विचारात घेत पंतप्रधानांनी हा निर्णय घेतल्याचे नमूद केले होते. पंतप्रधानांना शेतकऱयांची मोठी काळजी असल्याचे भाजप अध्यक्षांचे म्हणणे होते. अखेर 15 महिन्यांपासून या नेत्यांनी पंतप्रधानांना याचा सल्ला का दिला नाही? पंतप्रधानांनी कॅबिनेट बैठकीशिवायच ही घोषणा केल्याची तुम्ही दखल घेतलीत का असा प्रश्न चिदंबरम यांनी या नेत्यांना उद्देशून केला आहे.
निवडणुकीच्या भीतीने निर्णय
निवडणुकीच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांकडून तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे धोरणात बदल किंवा हृदयपरिवर्तनाने प्रेरित नाही. हा शेतकऱयांचा मोठा विजय असून काँग्रेस पक्षाचाही विजय असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे.