प्रतिनिधी/ चिपळूण
यावर्षी येथे 1 जूनला वेळेतच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे 22 जूनपर्यंत 755.24 मि. मी. इतक्या समाधानाकारक पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी मात्र या तारखेपर्यंत केवळ 155.25 मि. मी इतकाच पाऊस पडला होता. त्यामुळे यावर्षी शेती हिरवीगार दिसू लागली आहे. गेल्या 4 दिवसांपासून पाऊस थोडा गायब झाला असून अधूनमधून किरकोळ सरी कोसळत आहेत.
यावर्षी मे महिन्यापासूनच वातावरणात अनेक बदल झाले होते. त्यामुळे सातत्याने अवेळी पाऊसही जोरात कोसळला. त्यातच निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्याने त्या काळातही काहीसा पाऊस पडला. मात्र असे असले तरी पावसाचे आगमनही वेळेतच झाले आहे. 1 जूनला 6.55 मि. मी. पाऊस पडून सुरूवात झाली. त्यानंतर मात्र जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे 22 जूनपर्यंत 755.24 मि. मी. इतका पाऊस पडल्याची नोंद झाली असून हा पाऊस समाधानकारक मानला जात आहे. यामुळे शेतीच्या कामानीही वेग घेतला आहे. सर्वत्र शेती हिरवीगार दिसून येत आहे.
याउलट गतवर्षी 8 तारखेपासून अगदी किरकोळ पाऊस पडत होता. त्यामुळे 22 जूनपर्यंत केवळ 155.25 मि. मी. इतकीच नोंद झाली होती. मात्र 28 जूननंतर खऱया अर्थाने जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि 15 जुलैला तब्बल 14 वर्षांनी शहरात पूर आला. एवढेच नव्हेतर पावसाळय़ादरम्यान शहरात 14 वेळा पूरही आला. अनेक दिवस पुराचे पाणी तसेच राहिल्याने त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नागरिक, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. तसेच सर्वात मोठी दुर्घटना तिवरे धरण फुटून झाली. त्यात अनेकांचा बळी गेला याला येत्या काही दिवसांत 1 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे एकापाठोपाठ आलेल्या अनेक संकटांमुळे गतवर्ष सर्वांच्याच लक्षात राहिले आहे. .