प्रतिनिधी/ बेळगाव
जगात शांती हवी असेल तर विवेकानंदांचा विश्वबंधूत्व विचारच उपयोगी ठरेल, असे मत विवेकानंद केंद्र बेळगावचे कार्यकर्ते किशोर काकडे यांनी मांडले. शुक्रवार दि. 11 रोजी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी शाखा, गोवातर्फे आयोजित वेबीनारमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, 9/11 ही तारीख अमेरिकेच्या इतिहासातील आणि जगासाठी महत्वाची तारीख आहे. याच तारखेला ओसामाबीन लादेनने आतंकवादाचा प्रुर चेहरा जगाला दाखविला आणि याच तारखेला शिकागोमध्ये सर्व धर्मपरीषदेत विवेकानंद यांनी जगाला विश्वबंधूत्वाचा संदेश दिला. यामध्येच भारतीय सांस्कृतीचे महत्व कळते.
हे विश्वची माझे घर, चिंता करीता विश्वाची असे सांगणारे पसायदान मांडणारे ज्ञानेश्वर आणि त्यांचाच विचार एका अनोळखी देशातल्या व्यक्तींसमोर बंधू आणि भगिनींनो असे म्हणत विवेकानंदांनी मांडला आणि सभा जिंकली. त्याच विचारांनी प्रभावी झालेल्या मार्गारेट एलीझाबेथ पुढे भगिनी निवेदिता होवून भारतात काम करु लागल्या. जगात शांती हवी असेल तर भारत विवेकानंद आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील शांतीप्रिय देश म्हणून पुढे आला पाहिजे, असे ते म्हणाले.
संयोजक प्रा. वल्लभ केळकर व अन्य कार्यकर्त्यांनी स्वागत, प्रार्थना, गीत, अहवाल शांतीमंत्र सादर केले.