तरुण भारत कार्यालयातर्फे स्वातंत्र्यदिन सोहळय़ात किरण ठाकुर यांचे उद्गार
प्रतिनिधी /बेळगाव
अन्यायाविरुद्ध झुंज व लोकशिक्षण हे ‘तरुण भारत’चे ब्रीद आहे. या ब्रीदाला जागून ‘तरुण भारत’ने आजवर वाटचाल केली आहे. पुढील काळातही जनमताच्या भावनांचा, मतांचा आदर करून जनतेला ध्येयाप्रती पोहोचविण्यास सक्रीय रहा, असे मार्गदर्शन ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केले.
‘तरुण भारत’ परिवारातर्फे हिंडलगा कार्यालयामध्ये झालेल्या स्वातंत्र्योत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर रोमा ठाकुर, संपादक जयवंत मंत्री, लोकमान्य व ‘तरुण भारत’चे सीएफओ वीरसिंग भोसले, सीएमओ उदय खाडिलकर, पीआरओ गिरीधर शंकर, प्रोडक्शन मॅनेजर धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.
यंदा हिंडलगा कार्यालयात हाऊसकिपिंगचे काम करणारे जोतिबा आवडण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षारक्षकांनी शानदार पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले, पारतंत्र्यात ज्यांना रहावे लागले, त्यांना स्वातंत्र्याचे मोल कळते. शिवरायांना देश कसा चालवावा? हे अचूक माहिती होते. मी रयतेचा राजा असून सामान्यांसाठी काम करतो, असे ते म्हणत. आमचीही धारणा तीच आहे.
लोकशिक्षण व अन्यायाविरुद्ध झुंज या दोन हेतूने ‘तरुण भारत’ची स्थापना झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिवारातील प्रत्येक जण हा आमच्यासाठी कोरोना योद्धाच आहे. तुम्ही सर्वजण लढला म्हणून ‘तरुण भारत’ ठामपणे उभा राहिला. वृत्तपत्रानी विरोधी पक्षाची भूमिका बजावावी. जनता सामर्थ्यवान आहे, पण तिचा आवाज आपण व्हायला हवे. सर्वसामान्य व्यक्तींना आपण मोठे केले पाहिजे. आपल्या संस्थेचे आणि देशाचे नाव मोठे करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले.
यावेळी कोरोनाकाळात प्रत्यक्ष बिम्समध्ये जाऊन तसेच घटनास्थळी जाऊन वृत्तांकन करणारे, कोरोनाबाधित होऊनसुद्धा आपले काम चोख बजावणारे पत्रकार रमेश हिरेमठ यांचा किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रामाणिक सेवेबद्दल जोतिबा आवडण यांचाही सत्कार करण्यात आला.