ऑनलाईन टीम / मुंबई :
मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याच्या आरोपांसह अन्य मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखालील एमआयएमच्या मोर्चाने मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. काही तासातच हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकणार आहे. मात्र, मुंबईत ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 11 आणि 12 डिसेंबर या दोन दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याने हा मोर्चा आता मुंबईत कसा प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी मुलूंड चेकनाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, याठिकाणी राज्य राखीव पोलीस दलही तैनात आहे.
मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी अहमदनगर-औरंगाबाद सीमेजवळ मोर्चा अडवला होता. त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले होते. कोणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही, आम्ही आमचं एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालो आहोत. शिस्तबद्ध चालणाऱ्या वाहनांना आमचा अडथळा येणार नाही. रॅलीसाठी आपण पोलिसांची परवानगी घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी मोर्चा मुंबईकडे नेण्यास परवानगी दिल्याचे खासदार जलिल यांनी सांगितले.
दरम्यान, औरंगाबादच्या आमखास मैदानाहून एमआयएमचा हा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. या मोर्चात 100 हून अधिक चारचाकी वाहने आहेत. काही तासांतच एमआयएमचा हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल. हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर चांदिवली येथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा होणार आहे. मात्र, जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मुलूंड चेकनाक्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे मोर्चेकरी काय भूमिका घेणार आणि मोर्चा मुंबईत प्रवेश करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.