नितीशकुमार यांच्यासह बिहारमधील शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी बिहारमधील शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह वेगवेगळय़ा पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी बिहारमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, यापूर्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जातीय जनगणना न करण्याची घोषणा केली होती.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर जातीनिहाय जनगणनेच्या चर्चेने जोर धरला आहे. संपूर्ण देशभरातील विविध राजकीय पक्षांकडून, विविध राज्यांकडून यासंबंधीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले. आम्ही पंतप्रधानांना याविषयी लक्ष घालून योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी राज्य विधानसभेत दोनदा जातीच्या जनगणनेचे ठराव कसे पारित झाले याविषयीची माहितीही दिली असून पंतप्रधान लवकरच सकारात्मक निर्णय घेतील, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.
…तर माणसांचीही जातीनिहाय गणना आवश्यक ः तेजस्वी यादव
जातीनिहाय जनगणनेमुळे देशाला मोठा फायदा होईल. मंडल आयोगापूर्वी, देशात किती जाती आहेत हे माहीत नव्हते. सध्या देशात हजारो जाती आहेत. देशात जर जनावरांची, झाडांची मोजणी होते, तर मग माणसांचीही होणे आवश्यक आहे. कल्याणकारी योजनांसाठी जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. हे शिष्टमंडळ जे प्राप्त झाले आहे, ते केवळ बिहारसाठी नाही, ते संपूर्ण देशासाठी आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून नेहमीच राष्ट्रीय हिताच्या मुद्यांवर सरकारला पाठिंबा दिला आहे, असे राजद नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले. दरम्यान, जातीय जनगणना मुद्यावर आम्ही सर्वजण एकत्र आहोत. पंतप्रधानही याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असे बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी म्हटले आहे. त्यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता.
बिहारमधील दहा पक्षांचा शिष्टमंडळात समावेश
पंतप्रधानांना भेटलेल्या शिष्टमंडळात निजद, राजद त्यांच्याशिवाय काँग्रेस, एचएएम, व्हीआयपी, एआयएमआयएम, एमएल, सीपीआय आणि सीपीएमचे नेतेही सहभागी झाले होते. या शिष्टमंडळात भाजपकडून मंत्री जनक राम यांना पाठवण्यात आले. तसेच जेडीयूचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी, काँग्रेस नेते अजित शर्मा, सीपीआय (एमएल) नेते मेहबूब आलम, एआयएमआयएमचे अख्तरुल इमान, माजी मुख्यमंत्री आणि एचएएमचे अध्यक्ष जीतनराम मांझी, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी, सीपीआय नेते सूर्यकांत पासवान आणि सीपीएम नेते अजय कुमार सामील झाले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीची मागणी करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी त्यांना पंतप्रधानांकडून उत्तर मिळाले. त्यानुसार 23 ऑगस्टची वेळ देण्यात आली होती.