प्रतिनिधी /बेळगाव
धारवाड येथील जिल्हा पंचायत सदस्य योगीश गौडा खूनप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालय व बेंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात जामीन मिळूनही सुटीमुळे जामिनाची प्रत वेळेत मिळाली नाही. त्यामुळे शुक्रवारी कारागृहातून त्यांची सुटका झाली नाही.
योगीश गौडा खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला असला तरी या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून बेंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांची सुटका लांबणीवर पडली होती.
गुरुवारी बेंगळूर न्यायालयानेही जामीन मंजूर केला. तब्बल 9 महिन्यांनंतर शुक्रवारी त्यांची सुटका होणार म्हणून कारागृहाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र जामीनसंबंधीच्या आदेशाची प्रत सुटीमुळे मिळाली नाही. त्यामुळे शनिवारी न्यायालयाची प्रत मिळणार आहे. त्यानंतरच विनय कुलकर्णी यांची सुटका होणार असल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली तर कारागृहातून त्यांची सुटका होणार आहे. मात्र सुटका झाल्यानंतर विनय कुलकर्णी यांनी धारवाड जिल्हय़ात प्रवेश करू नये, अशी अट न्यायालयाने घातल्यामुळे बेळगाव जिल्हय़ातच ते वास्तव्य करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.