’तरुण भारत’ची स्पष्टोक्ती हेच कारण : सारवासारव असते सोप्पी, वास्तव विदारक
प्रतिनिधी /सातारा
महामारीच्या काळात काही चुका प्रशासनाकडून झाल्या मात्र त्याचा अतिप्रचंड परिणाम सामान्य जनतेवर झाला. त्या काही चुका ‘तरुण भारत’ने मांडून जाब विचारत घोटाळे बाहेर काढले. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखरसिंह गुरुवारी पत्रकार परिषद घेणार होते. म्हणून याच अंकात ‘तरुण भारत’ने अत्यंत महत्वाचे मुद्दे जाहीरपणे उपस्थित केले होते. मात्र, ‘तरुण भारत’च्या प्रश्नांना उत्तर देणं इतकं सोप्प नाही. कदाचित यामुळेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना जाहीर पत्रकार परिषद रद्द करावी लागली अशी वदंता आहे.
संपूर्ण महामारीच्या काळात अनेक वास्तव बाबी समोर आणून केवळ सातारा जिल्हा प्रशासन नव्हे तर महाराष्ट्र आणि केंद्रीय स्तरावर ‘तरुण भारत’ने अनेक बदल घडवून आणले. लाखो वाचक याचे साक्षीदार आहेत.
या साऱया पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषद असल्याचे मंगळवारीच जाहीर केले. ‘अचूक बातमी’च्या माध्यमातून महामारीच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून असणाऱया ‘तरुण भारत’ने गुरुवारी शेखर सिंह काय बोलतील याचा अंदाज काढला तेव्हा बाधितांचा अपलोड घोटाळा, त्यानंतर केलेल्या तकलादू कारवाया, मृत्यू आकडय़ांचा घोटाळा, त्यानंतर हॉस्पिटलला पाठवलेल्या तकलादू नोटिसा आणि कागदपत्रांनी भरलेल्या फाईली याशिवाय काहीच असणार नाही, हे लक्षात आल्यानंतर गुरुवारच्या अंकात ‘तरुण भारत’ने पहिल्या पानावर काही अत्यंत महत्वाचे प्रश्न जाहीररित्या मांडले.
माणसांचं जगणं असहय़ करणाऱया प्रशासनात कोणीच दोषी नाही हा सातारा जिल्हय़ानेच काय, राज्याने किंवा देशाने टेंभा मिरवलाय. यामुळे जगणं असहय़ झालेल्या जनतेचे ‘अचूक प्रश्न’ उपस्थित केल्याने ही तिन्ही प्रशासनानं उत्तर देण्यास हतबल राहिली. ‘अचूक प्रश्नांची अचूक उत्तरे’ देणं अशक्य झाल्यामुळेच माहिती मिळवण्यासाठी काही अवधी घ्यावा आणि मगच पत्रकार परिषदेला सामोरे जावे असे मानून गुरुवारची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. ‘तरुण भारत’ची उत्तरे मिळवणे हे आख्ख्या प्रशासनाला 24 तासात जमणार नाही यावरही अनेकजण ठाम आहेत.