प्रतिनिधी / बेळगाव
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील वीस जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांबरोबर शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांकडे बेळगाव जिल्हा अनलॉक करा अशी मागणी केली आहे. कोरोना संदर्भातील आढावा तसेच सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली आहे.
सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जिल्हय़ातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा या नद्यांना महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडले जाते. त्याबाबत महाराष्ट्राच्या अधिकाऱयांशी तसेच जलसंपदा मंत्र्यांशी आम्ही सतत संपर्कात असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होत असेल तर त्याबाबत आताच दक्षता घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना केली आहे. महाराष्ट्रातील जलाशयातून पाणी सोडण्यात येत असेल तर आधीच माहिती असणे महत्त्वाचे असून तुम्ही संपर्कात रहा, अशी सूचनादेखील यावेळी करण्यात आली. पाऊस अधिक प्रमाणात झाला तरी सध्या पूर नाही. वेदगंगा नदीला जास्त पाणी आले आहे. त्यामुळे चार गावांतील जनतेला स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
208 ग्राम पंचायतींना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे असल्यामुळे पूरपरिस्थिती पाहून तातडीने तेथील जनतेला स्थलांतरित करावे, अशी सूचना नोडल अधिकाऱयांना केली आहे. या सर्व ठिकाणी नोडल अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली असून ते देखरेख करत आहेत. पूर परिस्थिती निवारण्यासाठी दोन कोटी रुपये जिल्हय़ाकडे उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग करण्यात येईल. सध्या तरी आर्थिक कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हय़ासाठी 1 हजार कोटी रुपये आवश्यक
बेळगाव जिल्हय़ातील रस्ते, पूल व अन्य सार्वजनिक मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी किमान 1 हजार कोटी रुपये आवश्यक आहेत, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. जिह्यातील अनेक कामे अर्धवट आहेत. ती पूर्ण करण्यासाठी निधी हवा असून तो निधी द्यावा, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री आर. अशोक, गृहमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सला प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.