ई – पासला केराची टोपली
प्रतिनिधी/वारणानगर
लॉकडाऊनमध्ये अंक्षत: शिथीलता करण्यात आल्याने काही व्यवसायांना नियम व अटी नुसार परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी जिल्हाबंदी कायम असल्याने जिल्ह्याच्या सिमेवर असणार्या गावातील व्यवसायांना मोठी अडचण झाली आहे.
वारणा नदी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर आहे. नदीच्या दोन्ही तिरावरील गावात अलिकडे – पलिकडे रहाणाऱ्या नागरिकांचे व्यवसाय आहेत काही शेतकऱ्यांची नदीपलीकडील गावात शेती आहे अशा जिल्ह्याच्या सिमाभागात पाच दहा कि.मी. असणाऱ्या गावातील सर्वच व्यवसाय,शेती जिल्हा बंदीमुळे अडचणीत आले आहेत. नदीपलीकडील,शेजारच्या गावात दवाखाना आहे, मेडीकल आहे, किराणा मालाचे, हार्डवेअरचे, शेती औषधांचे, खताचे दुकान आहे, शेत आहे अशाना आपला व्यवसाय तर नोकरदारांना कामावर येण्याची अडचण जिल्हा बंदीमुळे झाली आहे.
दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवर आसणाऱ्या नदीपुलावर दोन्हीही जिल्हा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावला आहे तो आपले चोख कर्तव्य करू लागला आहे.
ई – पासला केराची टोपली……
राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यानी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा पर जिल्ह्यात जाण्यासाठी दि. ४ रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकात पोलीस अधिक्षक स्तरावर आधिकार दिले आहेत. यामुळे अत्यावशक सेवेत असणाऱ्या किंवा गरजेच्या व्यक्तींना ई – पास उपलब्ध होत आहेत. तथापी काहीचा पास नाकारून त्यावर तुम्हाला पासची आवश्यकता नाही स्वत्ताचे ओळखपत्र दाखवून प्रवास करावा असे स्पष्ट नमूद असून देखील अशा ई – पास धारकांना पोलीस धुडकावून लावत आहेत. त्या ई – पासला केराची टोपली दाखवत आहेत त्यामुळे शासनाने ई – पासची तरतूद करून काय उपयोग असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.
जिल्हा बदलून ये-जा पेक्षा तिथेच रहाण्याचा अजब सल्ला
नदीपलीकडील गांवात व्यवसाय असणाऱ्यांना किंवा नोकरदारांना तिथेच रहाण्याचा सल्ला पोलीस देत आहेत वास्तविक कोरोनामुळे, हॉटेल मेस बंद आहेत त्याच ठिकाणी रहायला घर देखील मिळणे गरजेचे आहे या सोयी उपलब्द होणे शक्य नाही त्यामुळे व्यवसाय, नोकरी असणाऱ्या ठिकाणी रहाण्याचा पोलीस देत असलेला अजब सल्ला कितपत योग्य आहे त्यामुळे ई – पासची वैधता तपासून पोलीसानी सोडण्याची गरज आहे.
नदी तिरावरील जवळच्या गांवाना सवलत मिळण्याची गरज …..
वारणानदी क्षेत्राच्या दोन्ही जिल्ह्यात असणाऱ्या गावात कोरोणा विषाणूचा प्रादूर्भाव नाही या क्षेत्रात एकही रूग्ण नाही. संपूर्ण भाग ग्रामीण आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या गावाना अलिकडे – पलीकडील गावात ये – जा करण्यास सवलत मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे.