नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशभरातील निवडक जिल्हाधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी जनतेची सेवा करणे हा एक विशेषाधिकार असून प्रत्येकाने त्यात मनापासून गुंतले पाहिजे. नव्या भारताचे स्वप्न जिल्हा आणि खेडय़ांमधूनच पूर्ण होईल, असे संवादादरम्यान पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले. देशात महत्त्वाकांक्षी जिल्हे (एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स) तयार करून देशातील अनेक जिह्यांचा खूप विकास झाल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकाऱयांच्या अभिनव कल्पनांचेही कौतुक केले. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आदींनीही या बैठकीत सहभाग घेतला.
केंद्राच्या विविध योजना लवकरात लवकर जिह्यापर्यंत पोहोचवणे हा पंतप्रधानांच्या संवादाचा उद्देश होता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशभरातील विकासयोजना आणि प्रकल्पांमध्ये येणाऱया समस्यांवर मात करण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. भविष्यातही देशभरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी या संवादादरम्यान केले. गावांचा, खेडय़ांचा, तालुक्यांचा आणि जिल्हय़ांचा विकास झाला तर देशाचा विकास करण्याचे स्वप्न सहजपणे साकार होईल, असा दावा पंतप्रधानांनी केला.
जिल्हाधिकाऱयांना दिले नवीन टार्गेट
जिल्हाधिकाऱयांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवीन उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत. कुपोषण, उपासमारीविरुद्धच्या लढय़ात त्यांनी आपले जिल्हे अव्वल करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. सरकारने या सर्व उद्दिष्टांची यादी तयार करून उद्दिष्टही निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
कार्यक्रमांचे रिअल टाईम ट्रकिंग
सुशासनाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱयांनी विभाग पातळीवरील सर्व कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. जिल्हा शासनाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहायला हवे, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. सर्व अधिकाऱयांसह समाजातील प्रत्येक घटकाने संयुक्तपणे काम केल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील, असेही ते पुढे म्हणाले.
पूर्वीचा विकास फक्त आकडय़ांमध्ये
पूर्वी विकास झाल्याचे केवळ आकडय़ांमधून दाखवले जात होते. परंतु स्वातंत्र्याच्या इतक्मया वर्षानंतरही देशातील अनेक जिल्हे मागे राहिले. वंचित राहिलेल्या जिल्हय़ांना मागासलेले जिल्हे म्हणून टॅग करण्यात आले. त्यांना पुढे नेण्यासाठीही धडपड करण्याची गरज आहे. आता पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातूनच विकास दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
जनधन खात्यात 4 ते 5 पट वाढ
गेल्या 4 वर्षांत देशातील जवळपास प्रत्येक महत्त्वाकांक्षी जिह्यात जन धन खात्यांमध्ये 4 ते 5 पट वाढ झाली आहे. जवळपास प्रत्येक कुटुंबाला शौचालय मिळाले आहे. गावागावात वीज पोहोचली असून विकासामुळे लोकांच्या जीवनात ऊर्जा संचारली असल्याचेही ते पुढे म्हणाले.