प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बारा जिल्हाधिकाऱयांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती घेतली. बेळगाव जिल्हाधिकाऱयांकडूनही त्यांनी माहिती घेतली असता जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्हा लॉकडाऊनची कोणतीच गरज नाही, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यामुळे लॉकडाऊनबाबत चाललेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
काही दिवसांत लॉकडाऊन होणार, अशा अफवा सुरू होत्या. यामुळे सोमवारी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. लॉकडाऊन झाले तर पुन्हा समस्या निर्माण होणार म्हणून अनेक जण खरेदी करत होते. मात्र, जिल्हाधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितल्यामुळे त्यावर पडदा पडला. सध्या परिस्थिती गंभीरच आहे. कारण कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यू पावणाऱयांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत आहे. रविवारी पूर्ण दिवस लॉकडाऊन करण्यात येत आहे. तरीदेखील कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक जाणकारांचे म्हणणे लॉकडाऊन करा, असेच आहे. मात्र, जिल्हाधिकाऱयांनी लॉकडाऊनची काही गरज नाही म्हणून सांगितल्याने आता लॉकडाऊन होणार नाही.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाबाबतची परिस्थिती जाणून घेतली. याचबरोबर यापुढेही आरोग्य विभागाने सतर्कतेने काम करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली आहे. काही जिल्हय़ांमध्ये रुग्णांची संख्या अधिक वाढल्याने लॉकडाऊन केले जाणार आहे. मात्र, बेळगावला त्यामधून वगळण्यात आले आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ, डॉ. तुक्कार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.