प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघड्यांचीच सरशी झाली आहे. सोमवारी 386 ग्रामपंचायतींचे मतमोजणी निकालानंतर हे चित्र समोर आले. राज्याचे लक्ष लागलेल्या खानापूर ग्रामपंचायतीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आमदार प्रकाश आबिटकर यांनी जोरदार दणका दिला. हातकणंगले, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळ्यात स्थानिक आघाडी, कागलमध्ये महाविकास आघाडी तर गगनबावड्यात काँग्रेसची सरशी झाली आहे. आता निवडून आलेल्या उमेदवारांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.
भुदरगडमध्ये सेनेची डरकाळी
भुदरगड तालुक्यात आमदार प्रकाश आबिटकर यांनी सेनेचा झेंडा फडकावला आहे. राज्याचे लक्ष वेधलेल्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनलने भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडवला. आमदार आमदार आबिटकर गटाला सहा जागा मिळाल्या येथे चंद्रकांत दादांच्या वाट्याला आलेली एक जागाही त्यांना राखता आली नाही. या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आबिटकर याचे फेसबुकवरुन अभिनंदन केले आहे.
हातकणंगले तालुक्यात आघाड्यांना संधी
हातकणंगले तालुक्या आघाड्यांचाच वरचष्मा राहिला आहे. वारणा पट्ट्यातील गावांमध्ये जनसुराज्यने अस्तित्व दाखवले आहे. तर इचलकरंजी परिसरातील गावात आमदार प्रकाश आवाडे गटाने गड राखले आहेत. लक्ष्मीवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा गट नेते अरुण इंगवले यांना जबर धक्का बसला आहे. येथे सेनेने 40 वर्षाच्या सत्तेला हादरा देत सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.
शिरोळकरांची यड्रावकरांना साथ
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 23 ग्रामपंचायतींवर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जनतेने साथ दिली आहे. तर बाल्लेकिल्ला समजला जात असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हाताला फारसे काही लागलेले दिसत नाही.
गडहिंग्लज, आजऱ्यात संमिश्र
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदार संघातील या दोन तालुक्यात स्थानिक पातळीवरच ग्रामपंचायत निवडणूक झाली. स्थानिक आघाड्यांना संमिश्र यश मिळाले. आजऱ्यामध्ये पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 10 ठिकाणी सत्तांतर तर 9 गावात सत्ता राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले.
कागलमध्ये मुश्रीफ गटाचे 234 सदस्य
राजकीय विद्यापीठ मानले जात असलेल्या कागल तालुक्यात 40 ग्रामपंचयतींवर महाविकास आघाडीची सत्ता आली तर केवळ दोन ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. 9 ग्रामपंचातीवर समिश्र यश आले आहे. मुश्रीफ गटाचे सर्वाधिक 234 सदस्या विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ खासदर मंडलीक गटाचे 97 माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाचे 87 तर भाजप जिल्हाध्यक्ष 76 उमेदवार विजयी झाले आहेत.
शाहूवाडी तालुक्यात सत्ताधाऱ्यांना झटका
शाहूवाडी तालुक्यात सत्तांतराचे वारे वाहिले. 33 पैकी 16 ठिकाणी सत्ताधाऱ्यांना नारळ देण्यात आला. 13 ग्रामपंचायतीवर भगवा फडकला तर 8 ठिकाणी जनसुराज्य- काँग्रेस आघाडीत तर 11 गावात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. पन्हाळा तालुक्यातही स्थानिक आघाड्यांचेच वर्चश्व राहिले आहे.
करवीरमध्ये स्थानिक आघाड्यांचे पारडे जड
49 पैकी 8 ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर, 12 ठिकाणी सत्ताधारी, 27 ठिकाणी स्थानिक आघाडी तर दोन ठिकाणी त्रिशंकू स्थीती निर्माण झाली आहे.