प्रतिनिधी/ रत्नागिरी
हवामान विभागाने 10, 11 जून रोजी रत्नागिरी जिह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात जिह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. चिपळूण, खेड आणि राजापूर या तीन तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राकडून 2 एनडीआरएफच्या टीम दाखल होणार आहेत. यामुळे 10 व 11 जून या कालावधीत जिह्यात कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिका आणि 31 गावे धोकादायक व पूरबाधित आहेत. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या भागातील नागरिक व ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. जिह्यात 5 फायबर बोटी सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
किनारपट्टीसाठी यंत्रणा सज्ज
किनारी भागात हायटाईड आणि पाऊस असा दुहेरी धोका असल्याने किनारी भागातील ग्रामस्थांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर केले जाईल. पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना न बांधता ठेवणे, बोटी सुसज्ज ठेवणे, कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोया व इतर सामग्रीची तजवीज करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
खबरदारीच्या सूचना
जिह्यात 45 दरड प्रवण क्षेत्रे असून त्या परिसरात येणाऱया गावांना खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. ज्या गावांना या अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्या सर्व गावांना तहसीलदारांमार्फत नोटिसा काढल्या जात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
कोविड सेंटरसाठी विशेष दक्षता
कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या तसेच ऑक्सिजन बफर साठा ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
साथीच्या आजारांची शक्यता
या काळात डेंग्यू, लेप्टोस्पायरसिस, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. यादृष्टीने आरोग्य विभागाकडून यंत्रणा सज्ज ठेवण्याचे काम सुरू आहे. पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढू शकते, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे संबंधित विभागांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही या दरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तहसीलदारांमार्फत जनजागृती
अतिवृष्टीबाबत जिह्यातील गावागावात दवंडीद्वारे माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात सूचना व आवाहन करण्याची जबाबदारी त्या तालुक्यातील तहसीलदारांना देण्यात आली आहे. 1 जूनपासून मच्छीमारी बंद आहे तरीही कोणी मासेमारीसाठी जात असेल तर त्यांच्यावर मत्स्य विभाग, तटरक्षक दल लक्ष ठेवून कार्यवाही करणार आहे..