रमेश गोरलसह सर्वच जिल्हा पंचायत सदस्यांनी केली जोरदार मागणी : अधिकाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी / बेळगाव
पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातूनच प्रत्येक गावाला निधी दिला जातो. मात्र काहीजण जाणूनबुजून ही कामे थांबवत आहेत. अधिकाऱयांवर दडपशाही करत आहेत, असा आरोप जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केला. या त्यांच्या आरोपाला सर्वच जिल्हा पंचायत सदस्यांनी एकजुटीने पाठिंबा देऊन यापुढे जिल्हा पंचायतीच्या निधीमध्ये कोणाचाच हस्तक्षेप होता कामा नये, असे सुनावले.
जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सदस्यांनी जोरदार आवाज उठवून त्याला संमती दर्शविली. येळ्ळूर गावाला 1 कोटी 20 लाखांचा निधी पाणी समस्या सोडविण्यासाठी मंजूर झाला. पाईप टाकण्यात आली. मात्र अचानक हे काम थांबविण्यात आले. याबाबत अधिकाऱयांना विचारले असता आम्हाला थातूर मातूर उत्तरे दिली जात आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत 60 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. आता जेजेएस या योजनेतून 5 कोटी निधी मंजूर झाला आहे. जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून हा निधी मंजूर होत आहे. असे असताना अधिकाऱयांवर दबाव घालून या योजना बंद पाडविल्या जात आहेत. असा आरोप रमेश गोरल यांनी केला आहे.
सभागृहामध्ये जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी आवाज उठविताच सर्वच जिल्हा पंचायत सदस्यांनी त्यांच्या या आरोपाला उचलून धरले. याचबरोबर अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे यापुढे कोणत्याच जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रामध्ये आमदारांचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही, असे बहुसंख्य जिल्हा पंचायत सदस्यांनी सुनावले. यामुळे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी जिल्हा पंचायतचा निधी असेल तर तेथे कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, असे आश्वासन दिले.
बैठकीला जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.