नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जी-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर सरकारच्यावतीने आता नियोजन बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पुढील वषी सप्टेंबरमध्ये जी-20 गटातील सर्व देशांच्या प्रतिनिधींची बैठक होईल. तत्पूर्वी देशाच्या वेगवेगळय़ा भागातही वेगवेगळय़ा बैठका होणार आहेत. या सर्व नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने 5 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत जी-20 च्या रणनीतीवर चर्चा होऊन कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे.
जी-20 विषयक चर्चेसाठी सोमवारी होणाऱया सर्वपक्षीय बैठकीला सुमारे 40 पक्षांना बोलावण्यात आल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी सांगितले. राष्ट्रपती भवनात होणाऱया या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह काही निवडक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सोमवारी दिल्लीत पोहोचणार आहेत.
भारताने 1 डिसेंबरलाच जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. इंडोनेशियाने बाली शिखर परिषदेत आगामी वर्षासाठी जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. पंतप्रधान मोदींनी ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.