प्रतिनिधी / सातारा :
शुक्रवार पेठेतील एका नाभिकावर शनिवारी सहा जणांनी चाकुने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्ला जुन्या भांडणातून झाल्याचे संशयित आरोपीकडून सांगण्यात आल्याची माहिती शाहूपुरीचे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी सांगितले.
शुक्रवार पेठेतील भगीरथ अपार्टमेंटच्या समोर आसनगाव कुमठे गावचा अमोल प्रकाश पवार (वय 35) यांचे सलुनचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी 4 वाजता त्याने दुकान बंद केले. नजिकच्या मिस्त्री सोबत तो बोलत होता. अचानक दोन दुचाकीवरून सहा अनोळखी युवक आले. त्यांनी पाठीमागून धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर अमोल पवार अचानक झालेल्या हल्ल्याने बचावासाठी पळून जाऊ लागला. तो कसाबसा दुचाकीवरून मित्र सचिन साळुंखे यांच्या घरी जखमी अवस्थेत गेला. त्यावेळी मित्र सचिन घरी नव्हता. त्यानंतर अमोल पवार याने घडलेला प्रकार त्याचा भाऊ रवी पवार याला फोनवरून सांगितला व घरी बोलवून घेतले. त्यानंतर त्याने अमोस यास जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या हल्ल्याबद्दल अमोल पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी यश नरेश जांभळे (वय 19) रा. शाहूपुरी, रोहन विकास निकम (वय 19) रा. दिव्यनगरी, हणमंत यनप्पा दौडमल्ली (वय 19) रा. दिव्यनगरी यांना शाहूपुरी पोलीसांनी सोमवारी ताब्यात घेतले. जुना भांडणाचा राग मनात धरून हल्ला केल्याचा जबाब ताब्यात घेतलेल्या संशयितांनी पोलीसांना दिला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करत आहेत.