नियमांचे पालन करत पार पडणार जोतिबा देवाचा नवरात्र उत्सव
एलईडी स्क्रीनवर चार ठिकाणी “श्री” च्या दर्शनाची सोय
भाविकानी नियम पाळून सहकार्य करावे
वार्ताहर / जोतिबा
महाराष्ट्रासह आसपासच्या राज्याचे लोकदैवत, कुलदैवत असलेल्या वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील श्रीजोतिबा देवाचा नवरात्र उत्सव कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखन्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन करुन साजरा केला जाणार असून भाविकानी नियम पाळून सहकार्य करण्याची अपेक्षा देवस्थान समिती व पूजारी मंडळीतून होत आहे.
श्री जोतिबा देवाचे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पूजाविधीत खंड पडू नये यासाठी नवरात्र उत्सव शासन नियम अटी पाळून साजरा करण्यात यावा अशी लाखो भाविक भक्तांची भावना असून याचा आदर राखून शासनाने “श्री” च्या नवरात्र उत्सवास परवानगी देण्याची मागणी होऊ लागली आहे. कोरोनामुळे “श्री” ची मुख्य चैत्र यात्रा तसेच श्रावणषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली होती शिवाय मंदीरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे कोरोनात बंद केलेले अनेक उपक्रम हळूहळू सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे धार्मिक देव कार्यालादेखील परवानगी मिळण्याची मागणी होत आहे.
केदारलिंग देवस्थान व्यवस्थापन उपसमिती वाडीरत्नागिरी येथील कार्यालयात कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, उपसरपंच शिवाजी सांगळे, देवस्थानचे इनचार्ज श्री. दिंडे, “श्री” चे मुख्य पुजारी दहा गावकर यांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सवा निमीत्त अढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनामुळे बंद ठेवलेले मंदिर, रद्द केलेल्या चैत्र व श्रावणषष्ठी यात्रा यामुळे भाविकात नवरात्र उत्सवात परपंरात खंड पडू नये याची होत असलेली मागणी या अनुषगाने विचार करण्यात आला.
नवरात्र उत्सव काळात “श्री” चे मंदीर बंदच राहील तथापी सर्व पूजा विधी केल्या जातील भाविकासाठी एलईडी स्क्रीनवर चार ठिकाणी “श्री” च्या दर्शनाची सोय करावी, नवरात्र निमीत्त तेल, नारळ व पूजा साहित्य पूजाऱ्यानी प्रमुख तीन दरवाजावर स्विकारावे, भाविकानी मास्क लावून तसेच सुरक्षित अतंर राखून मूख दर्शन करून माघारी फिरावे, पार्किग असलेल्या ठिकाणीच वहाने लावावीत, गर्दी करण्याचे कटाक्षाने टाळावे, ”श्री” चा पाऊसाळ्यात बंद झालेला पालखी सोहळा दसऱ्या दिवशी सुरू होता. यावेळी दसऱ्याचा पालखी सोहळा मोजक्याच पूजारी व भाविकांच्या उपस्थितीत शासन नियम पाळून पार पाडावा यावर प्राथमिक स्वरूपात आयोजीत बैठकीत चर्चा करण्यात आली असून पन्हाळा प्रातांघिकारी, तहसिलदार यांना सदर बैठकीचा अहवाल सादर करून नवरात्र उत्सवावर निर्णय होणार आहे.