महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातल्या दोडामार्ग तालुक्यातील निसर्गसंपन्न असा तिळारी नदीकिनारी वसलेला झोळंबे तेथील माउली मंदिरातल्या काविकलेच्या वारशासाठी प्रसिद्धीस आलेला आहे. एकेकाळी गोवा, कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड जिल्हय़ातली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली सिंधुदुर्ग जिल्हय़ातली मंदिरे काविकलेच्या समृद्ध अशा संचितांसाठी ख्यात होती. एकेकाळी कोकण प्रांतातल्या प्रचंड पर्जन्यवृष्टी आणि दमट हवामानात आपल्या दैवतांच्या मंदिरांसाठी केलेले रंगकाम टिकावे म्हणून इथल्या कष्टकऱयांनी अत्यंत कल्पकतेने काविकलेचा उपयोग केला. महाराष्ट्रातल्या आदिवासी वारली लोककलेची मोहिनी भारतभर पडलेली असून गोव्यातल्या कारागिरांनी आपल्या परिसरातल्या मंदिरांचे रंगकाम करण्यासाठी परिस्थितीला अनुसरून ज्या लोककलेचा वापर केला ती आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे. काविकलेत वापरण्यात येणारे नैसर्गिक रंग आणि चित्रांचे रेखाटन करण्यासाठी ज्या कल्पनाबंधांचा आणि सांस्कृतिक संचितांचे नियोजन इथल्या कारागिरांनी गोवा-कोकणात कोसळणारा मोसमी पाऊस आणि दमट हवामानाचा प्रामुख्याने विचार करून केले होते. तांबडय़ा रंगात इथल्या वृक्षवेली, पशुपक्षी त्याचप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक संचितांतून प्रेरणा घेऊन कारागिरांनी काविकलेचा कौशल्यपूर्णतेने वापर केला होता.
काविकला ही प्रदेशानिष्ठ असून इथल्या कारागिरांनी जेव्हा प्रचंड प्रमाणात कोसळणाऱया पावसाचा आणि दमट हवामानाचा विचार केला तेव्हा त्यांना या कलेचा वापर यथोचित वाटला आणि म्हणून त्यांनी आपल्या आराध्य, ग्रामदैवताच्या मंदिरासाठी या पारंपरिक कलेचा वापर करण्यावर भर दिला. काविकलेतल्या रंगकामासाठी त्यांनी वृक्षवेली, वाळू, माती, शिंपले यासारख्या परिसरात जे घटक उपलब्ध होते त्यांचा वापर करून प्रादेशिक कलाकुसरीचा सुंदर आविष्कार घडविला होता. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ज्या कोकण प्रांतांवरती कदंब राजांची सत्ता स्थापन झाली होती तेथील बऱयाच मंदिरांवरती काविकलेचा आविष्कार करण्यात आला होता. पेडणेतील मूळवीर, चोपडेतील बेताळ, मुळगावातील रवळनाथ, अडवलपाल येथील मारुती मंदिर, कारवारजवळील अंकोला येथील महामाया मंदिर, शिर्सी येथील मरिकम्मा, काणकोण येथील काही मंदिरांच्या रंगकामासाठी काविकलेतल्या संचितांचा विनियोग केला होता. गोवा-कोकणात गवंडी, सुतार, च्यारी, चितारीसारख्या कारागिरांनी तर कर्नाटकातल्या गुडिकरांनी या कलाकौशल्याचा आविष्कार उत्स्फूर्तरित्या घडविला होता. खुबे, तिसऱयासारख्या कवचधारी माशांच्या शिंपल्यांपासून तयार केलेला चुना, परिसरातील उपलब्ध काव, वाळू, गूळ आणि वृक्षवेलीतल्या दोषक घटकांचे मिश्रण करून ते आठवडाभर आंबवून प्रतिभावंत कारागीर मंदिराच्या गर्भगृह, सभामंडप, खांबावरती रंगकामासाठी नियोजनबद्ध वापर करायचे. पाऊसवारा, वादळ, दमटपणा यांचा मारा समर्थपणे सोसत मंदिरांवरची काविकला टिकून होती. आपल्या पूर्वजांचा हा वारसा समजून घेतलेला नसल्याने हा हा करता कोकण प्रांतातून काविकलेचा हा वारसा आणि तिच्याशी निगडित कारागीर विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे. अशा पार्श्वभूमीवरती झोळंबे गावातील माड-पोफळी आणि वृक्षवेलीच्या सान्निध्यातले ग्रामदेवी माउलीचे मंदिर इतिहास, लोककला, समाजजीवन, पुरातत्व या क्षेत्रातल्या संशोधक, अभ्यासक, कलारसिक यांच्यासाठी आशेचे किरण ठरले होते.
दोडामार्ग तालुक्यातल्या बहुतांश गावातल्या जुन्या मंदिरांच्या स्थापत्यकला, रंगकाम, काष्ठशिल्प, मूर्तीकला आदींचा अनन्यसाधारण महत्त्वाचा काडीमात्र विचार न करता जीर्णोद्धार करण्याच्या नावाखाली नूतनीकरण केले जात असल्याकारणाने आज त्यांचे गतवैभव नष्ट होत चालले आहे. झोळंबे गावातील माउली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मंडळाची स्थापना होऊन त्याला नवा साज द्यावा म्हणून गाव, पंचक्रोशीबरोबर चाकरमानी सक्रिय झाल्याने काविकलेचा इथला वारसा आगामी काळात भोसलेंच्या राजवटीत मणेरी महालात समाविष्ट होणाऱया घाट मार्गावरती झोळंबे वसल्याकारणाने महिषासूरमर्दिनीच्या रूपातल्या माउली मंदिराचे बांधकाम स्थानिक हवामान, पर्जन्यवृष्टी आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, कारागिरांनी कल्पकता आणि कौशल्याने केले होते. त्यामुळे गेल्या शेकडो वर्षांपासून मंदिरातले रंगकाम टिकून राहिले होते. उत्तर कन्नड जिल्हय़ातल्या वनवासी येथील मधुकेश्वरांच्या गोवा कदंब कालखंडातल्या मंदिरावरच्या काविकलेचा वारसा अल्प प्रमाणात तग धरून आहे. सुमारे 700-800 वर्षांपासून काविकलेला कोकणात तत्कालीन राज्यकर्त्यांनी आश्रय दिला होता आणि त्यामुळे ही मंदिरे भाविकांवरती धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार करत होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या पारंपरिक लोककलेचे महत्त्व भौगोलिक आणि हवामान दृष्टिकोनातून समजून घेऊन टिकविण्याची नितांत गरज होती परंतु हा वारसा आकलन होण्यासाठी आवश्यक प्रदेशानिष्ठ शिक्षणप्रणाली नसल्याने हे वैभव झपाटय़ाने लोप पावत आहे.
झोळंबेच्या माउली मंदिरात काविकलेच्या विलोभनीय संचितांचा समृद्ध वारसा असून त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने समाज आणि सरकार यांनी सामंजस्याने प्रयत्न केले नाही तर काविकलेच्या गतवैभवाचे संचित कायमचे इतिहासाच्या उदरात गडप होईल. या मंदिरातल्या चित्रात विघ्नहर्त्या गणपतीबरोबर शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी नारायण, गरुडावरती आरुढ झालेले लक्ष्मीनारायण, बालकृष्णाच्या लीला आदी भागवत संप्रदायाचा प्रभाव दर्शविणाऱया चित्रांबरोबर या परिसरातल्या जैविक संपदेच्या घटकांचे चित्रण पहायला मिळते. साखळीबंद केलेला कुत्रा, हाती फुले धारण केलेल्या स्वागतोत्सुक अशा सुंदर ललना, साप-गरुड यांचे पारंपरिक वैरत्व… आदी बाबींचे दर्शन अनुभवायला मिळते. गोवा-कोकणातल्या कारागिरांनी माउली मंदिरात काविकलेच्या चित्रांचा आविष्कार घडविताना स्थानिक, भौगालिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पैलूंचा जो समग्रपणे विचार केला होता त्याचे सुंदर प्रतिबिंब उमटल्याची प्रचिती येते. सिंधुदुर्गात एकेकाळी काविकलेच्या संचिताचे दर्शन घडविणारी जी मंदिरे होती त्यांना आधुनिक साज लाभलेला आहे. सिमेंट-काँक्रिट, टाईल्स, विजेची रोषणाई, रासायनिक रंगरंगोटी अशा कृत्रिम सौंदर्याने भाविकांचे डोळे दिपवणारी ही मंदिरे समाजमनाचा आकर्षण बिंदू ठरलेला आहे परंतु त्यांच्या लखलखाटासमोर काविकलेचा आविष्कार देव्हाऱयात तेवणाऱया नंदादीपासारखा असल्याने हा वारसा जपण्याची नितांत गरज आहे.