बेळगाव विभागातील 1 हजारांहून अधिक टपाल कर्मचारी संपात सहभागी : केंद्र सरकारविरोधात घोषणा : आजही होणार संप
प्रतिनिधी /बेळगाव
खासगीकरणासह कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील कामगारांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. दि. 28 व 29 असे दोन दिवस हा संप चालणार असून सोमवारी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात विविध कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत खासगीकरणाला आपला विरोध दर्शविला. बेळगाव विभागात एक हजारांहून अधिक टपाल कर्मचाऱयांनी या संपामध्ये सहभाग घेतला होता.
शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयासह ग्रामीण डाकसेवक व इतर कर्मचाऱयांनी या संपामध्ये सहभाग घेतला. कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा कर्मचाऱयांनी केंद्र सरकारला दिला. नवीन पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन सुरू करावी, कमलेशचंद्र आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्या, यासह इतर मागण्यांसाठी पोस्ट कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
मुख्य पोस्ट कार्यालयातील अधिकारी धमेंद्र जाई म्हणाले, ‘पोस्ट कर्मचाऱयांनी दिलेल्या सर्व जबाबदाऱया उत्तमरितीने पार पाडल्या आहेत. आयबीपीएस अकाऊंट, गोल्डबॉण्ड यासह इतर योजनांमध्ये बेळगाव विभाग राज्यात प्रथम आहे. पोस्ट कर्मचारी रात्रंदिवस काम करताना त्यांच्या मागण्या मान्य करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. खासगीकरण झाल्यास सर्व कर्मचारी रस्त्यावर येतील.’
पोस्ट कार्यालयांमध्ये शुकशुकाट
सोमवारी आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने नागरिक आपल्या विविध कामांसाठी पोस्ट कार्यालयांमध्ये दाखल होत होते. परंतु पोस्ट कार्यालय कर्मचाऱयांविना बंद असल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले. मुख्य पोस्ट कार्यालयात आधारकार्ड, पासपोर्ट यासह इतर सेवा सोमवारी बंद राहिल्या. त्यामुळे कामासाठी नागरिकांना बुधवारी कार्यालयांमध्ये जावे लागणार आहे.
धर्मवीर संभाजी चौकात विविध संघटनांचे आंदोलन
खासगीकरण, वाढत्या महागाईविरोधात सीटूसह इतर विविध कामगार संघटनांनी धर्मवीर संभाजी चौक येथे केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य भरडले जात आहेत. तसेच कामगारविरोधी धोरणांमुळे कर्मचारी अडचणीत आहेत. याविरोधात दोन दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे. बीएसएनएल, विद्युत, परिवहन, बँका, अंगणवाडी, पंचायत कर्मचारी यासह इतर कामगार संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.